अ‍ॅपशहर

कृषी अधिकाऱ्यांना घेराव

जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात बोगस बी. टी. बियाणे कंपन्यांच्या फसवणुकीच्या प्रकाराबाबत गुरुवारी (दि. २३) शिवसेनेकडून जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांना घेराव घालण्यात आला.

Maharashtra Times 24 Nov 2017, 4:00 am
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena aggressive on bogus b t seeds at jalgaon agriculture officer
कृषी अधिकाऱ्यांना घेराव


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात बोगस बी. टी. बियाणे कंपन्यांच्या फसवणुकीच्या प्रकाराबाबत गुरुवारी (दि. २३) शिवसेनेकडून जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांना घेराव घालण्यात आला. याबाबत दोषी बी. टी. बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी जिल्हा कृषी अधिकारी गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच कार्यालयातून माघार घेतली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही ठिकाणी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याबाबत चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथे कापूस पिकाचे बी. टी. बियाणे बोगस असल्याचे अहवालात समोर आले आहे. यामुळे शेतकरी बांधवांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. २३) जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथील एका कंपनीतील कीटकनाशके व बियाणे यांचा नमुना अप्रमाणित असल्याचा अहवाल आल्यानंतर कंपनीचे विक्री प्राधिकार पत्र कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे. या कंपनीसोबत राज्यातील ७ ते ८ कंपन्यांवर अवैध कीटकनाशके सापडल्याने अशीच कारवाई करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या कंपन्याविरुद्ध जिल्ह्यातदेखील गुन्हा दाखल झालाच पाहिजे या मागणीसाठी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात गुरुवारी जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांना घेराव घालण्यात आला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत दालनातून जाणार नाही, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता. त्याचठिकाणी शिवसैनिकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेवटी सोनवणे यांनी गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी जिल्हा संघटक ह. भ. प. जळकेकर महाराज, जिप सदस्य पवन सोनवणे, महानगरप्रमुख शरद तायडे, कुलभूषण पाटील, गजानन मालपूरे, जानकीराम पाटील, राहुल नेतलेकर, सोहम विसपुते आदी उपस्थित होते.
वीजबिल समस्येबाबत रावेरला आज मोर्चा

रावेर : फसवी कृषी संजीवनी योजना बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण वीजबिले माफ करावे यासह विजेसंदर्भातील विविध समस्या व मागण्यांसाठी तालुका शिवसेना, युवा सेनेतर्फे आयोजित मोर्चा आज (दि. २४) रोजी महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकणार आहे. दि. २४ नोव्हेंबर शुक्रवारी दुपारी १२ वाजता, शहरातील छोरीया मार्केटमधून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, तालुकाप्रमुख योगीराज पाटील, युवा सेनेचे अविनाश पाटील, प्रवीण पंडित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा महावितरणच्या कार्यालयावर धडकणार आहे. तरी या मोर्चास तालुका शिवसेना, युवा सेना पदाधिकारी, शिवसैनिक युवासैनिक, शेतकरी बांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख नितीन महाजन, राकेश घोरपडे यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज