अ‍ॅपशहर

जळगाव-धुळे विनावाहक सेवेच्या फेऱ्यांमध्ये कपात

एसटीच्या प्रवाशांना जळगाव-धुळे मार्गावर अतिजलद सेवा मिळावा म्हणून सुरू करण्यात आलेल्या विनावाहक-विनाथांबा बससेवेकडे प्रवाशांनी मात्र, पाठ फिरवली आहे. मार्गात कुठेही थांबा नसल्याने ही सेवा प्रवाशांना आकृष्ट करू शकलेली नाही. त्यामुळे एसटीलाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

Maharashtra Times 28 Jul 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम st bus jalgaon to dhule
जळगाव-धुळे विनावाहक सेवेच्या फेऱ्यांमध्ये कपात


एसटीच्या प्रवाशांना जळगाव-धुळे मार्गावर अतिजलद सेवा मिळावा म्हणून सुरू करण्यात आलेल्या विनावाहक-विनाथांबा बससेवेकडे प्रवाशांनी मात्र, पाठ फिरवली आहे. मार्गात कुठेही थांबा नसल्याने ही सेवा प्रवाशांना आकृष्ट करू शकलेली नाही. त्यामुळे एसटीलाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

एसटीने गेल्या वर्षीदेखील जळगाव-धुळे विनावाहक सेवा सुरू केली होती. त्यावेळीही प्रवाशांकडून प्रतिसाद न मिळाल्याने ही सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी १८ जुलैपासून ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या आठवड्यात दिवसभरात १५ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, दुसऱ्याच आठवड्यात एसटीने पाच फेऱ्या कमी केल्या आहेत. विनावाहक व विनाथांबा बससेवा असल्याने जोपर्यंत बस पूर्ण भरत नाही तोपर्यंत ही बस स्थानकामधून सुटत नाही. त्यामुळे प्रवाशांना अर्धा ते एक तास बसमध्येच बसून राहावे लागते. त्यामुळे नियमित बस एवढाच वेळ प्रवाशांना धुळ्यापर्यंतच्या प्रवासासाठी लागतो. त्यामुळेही प्रतिसाद मिळत नसल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले. जळगावहून थेट धुळ्यासाठी जाणारे प्रवासी कमी असतात. त्यामुळे बस भरायला वेळ लागतो. एसटीने एरंडोल, पारोळा व मुकटी या मोठ्या गावांसाठी थांबा घेतला, तर प्रवासी मिळतील. त्यामुळे आर्थिक नुकसान टळू शकेल, अशी सूचनाही प्रवाशांमधून पुढे आली आहे.

औरंगाबादसाठी विनाथांबा सेवा?

जळगाव आगाराकडून जळगाव-धुळे विनाथांबा बससेवेप्रमाणेच जळगाव-औरंगाबाद बससेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. औरंगाबाद प्रमाणेच जिल्ह्यातील भुसावळ, यावल व चोपडा या तीन तालुक्यांसाठी विनावाहक बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एसटीकडून देण्यात आली आहे.

‘आषाढी’चा एसटीला लाभ

जळगाव : यंदा आषाढी एकादशीला एसटीतून ३८ हजार प्रवाशांनी पंढरपूरची वारी केली. त्यामुळे एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाला ३० लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गेल्यावर्षी २६ हजार १२९ प्रवाशांनी आषाढीची वारी केली होती, तर यावर्षी ३८ हजार २४४ प्रवाशांनी आषाढीची वारी केली. आषाढीसाठी एसटीकडून ८० गाड्या सोडण्यात आल्या होत्या. एकूण ३१० फेऱ्या करण्यात आल्या. गेल्यावर्षी ३१० फेऱ्यांद्वारे २७ लाख ६६ हजार रुपयांचे उत्पन्न एसटीला मिळाले होते. दरम्यान, यंदा जिल्ह्यातून पंढरपूरसाठी दोन मोफत रेल्वे सोडण्यात आल्यामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली असल्याचा दावा एसटीच्या सूत्रांनी केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज