अ‍ॅपशहर

‘एम. जे.’त रंगणार पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने रविवारी दि. ११ ऑगस्टपासून मुळजी जेठा महाविद्यालयात दोन दिवसीय पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन होणार आहे. विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव दिल्यानंतर या प्रकारचे हे पहिलेच संमेलन होत आहे.

Maharashtra Times 9 Aug 2019, 5:00 am
११ ऑगस्ट रोजी आयोजन; ग्रंथदिंडीने होणार सुरुवात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the first student literature meeting to be held in jalgaon at mulji jetha college
‘एम. जे.’त रंगणार पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने रविवारी दि. ११ ऑगस्टपासून मुळजी जेठा महाविद्यालयात दोन दिवसीय पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन होणार आहे. विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव दिल्यानंतर या प्रकारचे हे पहिलेच संमेलन होत आहे.

विद्यापीठाचा पहिला नामविस्तार दिन ११ ऑगस्ट रोजी येत असून, खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटी या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या संस्थेच्या मुळजी जेठा महाविद्यालयात याचदिवशी ‘बहिणाबाई साहित्य नगरी’त हे संमेलन होत आहे. सकाळी ९ वाजता काव्यरत्नावली चौक ते मु. जे. महाविद्यालय अशी ग्रंथदिंडी निघणार आहे.

सकाळी ११ वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात साहित्यिक डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील राहतील. प्रमुख अतिथी म्हणून केसीईचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेंडाळे असणार आहेत. दुपारी १२ ते ४ या वेळेत ‘साहित्य संवाद’ अंतर्गत मान्यवर साहित्यिक हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून चांगले लिखाण असणाऱ्या व सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करतील. सायंकाळी ५ वाजता ‘खान्देशची लोकधारा’अंतर्गत ‘माहेरी आल्या बहिणाई’ हा कार्यक्रम होणार असून, त्यामध्ये बोलीभाषेतील गाणी, उखाणे सादर केले जातील. रात्री ८:३० वाजता बालकवी ठोंबरे काव्यमंचावर कविसंमेलन होईल.

परिसंवादासह मुलाखतीची शब्दमेजवानी
सोमवारी दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ‘सोशल मीडिया आणि तरुणाई’ या विषयावर विद्यार्थ्यांचा परिसंवाद होईल. त्यानंतर १० ते १२ या वेळेत कै. राजा महाजन कथामंचावर कथाकथन होईल. दुपारी १२ वाजता ‘आम्ही काय वाचतो?’ या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी २ वाजता ‘साहित्य आणि समाज’ या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी ३ ते ४ या कालावधीत कवी पुरुषोत्तम पाटील मंचावर ‘फेसाटी’ कादंबरीकार व साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते नवनाथ गोरे आणि कवी सुशीलकुमार शिंदे यांची प्रकट मुलाखत होईल. सायंकाळी ४ वाजता प्र-कुलगुरू प्रा. पी. पी. माहुलीकर यांच्या अध्यक्षतेखाली या विद्यार्थी साहित्य संमेलनाचा समारोप होईल. या वेळी हैदराबाद येथील डॉ. जयंत कुलकर्णी व जळगाव येथील शशिकांत वडोदकर हे प्रमुख अतिथी असतील, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील, कुलसचिव भ. भा. पाटील, प्राचार्य उदय कुलकर्णी, विद्यार्थी विकास संचालक डॉ. सत्यजित साळवे यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज