अ‍ॅपशहर

जळगावकरांना भरली हुडहुडी

उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींचा जोर वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात थंडीची हुडहुडी वाढली आहे. गेल्या आठ दिवसांत किमान तापमानात घट झाली असून, किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. थंडीचा कडाका वाढल्याने जळगावकरांकडून आता उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. दिवसाची सुरुवात काहिशी उशिराने होताना दिसत आहे.

Maharashtra Times 10 Jan 2018, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम winter season news in jalgaon city
जळगावकरांना भरली हुडहुडी


उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींचा जोर वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात थंडीची हुडहुडी वाढली आहे. गेल्या आठ दिवसांत किमान तापमानात घट झाली असून, किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. थंडीचा कडाका वाढल्याने जळगावकरांकडून आता उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. दिवसाची सुरुवात काहिशी उशिराने होताना दिसत आहे.

जळगावात नोव्हेंबर महिन्यापासून थंडीची चाहुल लागली. त्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात थंडीचा जोर कमी झाला होता. अचानक किमान तापमान वाढून पुन्हा १५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. यामुळे थंडीदेखील गायब झाली होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून तापमानात घट आली असून, किमान तापमान १० ते ९ अंश सेल्सिअसवर तापमानाचा पारा स्थिरावला आहे.

कमाल तापामानातही घसरण आल्याने गारठ्यात कमालीची वाढ झाली आहे. झोंबणाऱ्या गार वाऱ्यांनीही जळगावकरांची हुडहुडी वाढवली आहे. शहरात दुपारीही अंगाला प्रचंड गारठा जाणवत आहे. थंडीचा जोर वाढल्याने उबदार ब्लँकेटच्या घड्या उघडण्यास सुरुवात झाली आहे. शिवतीर्थ मैदानावर आलेल्या स्वेटर विक्रेत्यांकडे खरेदीसाठी नागरिकांची रा‌त्री उशीरापर्यंत झुंबड उडत आहे. हिवाळ्यात ऐरवी सकाळी नऊ वाजेपर्यंत व सायंकाळी सात वाजेनंतर नागरिकांच्या अंगात दिसणारे उबदार कपडे दोन दिवसांपासून दुपारीही अंगावर दिसत आहेत.

थंडीचा जोर ओसरणार

उत्तरेकडील वार्‍याचा वेग वाढल्यामुळे जळगावसह मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट वाढली आहे. आणखी चार ते पाच दिवस ही लाट अशीच कायम राहील. त्यानंतर मात्र, थंडीचा जोर ओसरणार असल्याची माहिती भारतीय हवामान विज्ञान विभागाने दिली आहे. जळगावसह मध्य महाराष्ट्रात आणखी ४ ते ५ दिवस थंडी राहील. १४ जानेवारीपासून वातावरणात बदल होण्यास प्रारंभ होईल. तापमान वाढू लागेल. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडी कमी होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरण सातत्याने बदलत असून, दिवसा गरम आणि रात्री थंडी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सर्दी, ताप, खोकला, डायरिया यांसह टायफॉइडसारखे विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. टायफॉईडचीही साथ सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज