अ‍ॅपशहर

महावितरणचे अधीक्षक अभियंता अर्शदखान पठाण निलंबित; ढिसाळ कारभारामुळे कारवाई

Jalna News : जालना येथील महावितरणचे अभियंता अर्शदखान पठाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 23 Mar 2023, 11:25 am
म. टा. प्रतिनिधी, जालना : ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता अर्शदखान पठाण यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. जालना मंडळाचे अधीक्षक अभियंता पठाण यांच्याविरोधात अनेक गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pathan
महावितरणचे अभियंता अर्शदखान पठाण निलंबित; ढिसाळ कारभारामुळे कारवाई


यात प्रामुख्याने दैनंदिन कामात हयगय करणे, वीजबिल थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश, जिल्ह्यातील बिघडलेल्या ट्रान्स्फॉर्मरसंदर्भात दखल न घेणे, रोहित्र बिघाडाचे प्रमाण कमी करण्यात अपयश, वीजग्राहकांच्या प्रत्यक्ष मीटर वाचनाप्रमाणे बिलांचे प्रमाणात आलेली प्रचंड घट, वीज वितरण सुव्यवस्था राखण्यात अपयश, महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्याकडे दुर्लक्ष अशा सर्वच पातळ्यांवर त्यांची सुमार कामगिरी असल्याच्या तक्रारींचा समावेश आहे.

त्याबरोबरच वारंवार निर्देश देऊनही सुधारणा नसल्याच्या तक्रारीवरून मुख्यालयाकडून पठाण यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती ‘महावितरण’ सूत्रांनी दिली. पठाण यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर येथील अधीक्षक अभियंता संजय सरग यांची बदली झाली असून, सरग यांनी तातडीने पदभार स्वीकारला आहे.

ढिसाळ कारभाराला नागरिक वैतागले

जालन्यातील ‘महावितरण’च्या कारभाराला ग्राहक वैतागून गेले आहेत. वीज वापर नसताना ग्राहकांना लाखो रुपयांची बिले देण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील अनेक गावांत १२ तास वीज उपलब्ध होत नाही. अनेक गावांत १५ ते २० दिवस वीज पुरवठा नसल्याच्या तक्रारी आहेत. ‘महावितरण’ची कोणतीच कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत. त्यामुळे पठाण यांच्यावर झालेल्या कारवाईचे वीज ग्राहकांनी स्वागत केले आहे.

महत्वाचे लेख