Sachin.Yadav@timesgroup.com
tweet:@sachinyadavMT
कोल्हापूर : भारत राखीव बटालियनमधील लाचखोरीचा प्रकरणातील महत्वाचा मुद्दा लाचेचे पैसे जमा करणाऱ्या बँक खात्याचा आहे. खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव यासंदर्भात चर्चेत आहे. वरकमाईचे पैसे त्याच्यासह खात्यातील १७ जणांच्या खात्यांवर भरण्यात आले आहेत. यामध्ये दोन खासगी व्यक्तींच्या बँक खात्यांचा समावेश आहे. एका राष्ट्रीयीकृत बँकेसह एका बड्या खासगी बँकेत खात्यावर व्यवहार झाले आहेत.
लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडू नये, यासाठी वरिष्ठांनीच ऑनलाइन पैसे ट्रान्स्फरची यंत्रणा कार्यन्वित केली. त्यानुसार बटालियनमधील १७ कर्मचाऱ्यांची पैसे गोळा करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. जवानांकडून विविध कामांसाठी घेतलेली लाच पद्धतशीरपणे या १७ जणांच्या खात्यावर ट्रान्सफर केली जाते. त्यासाठी चार ते पाच वर्षांपूर्वी एका राष्ट्रीयकृत बँकेत सर्वांची खाती उघडण्यात आली. या ठिकाणी या कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन जमा केले जाते. गेल्या सहा महिन्यांपासून ही सर्व खाती एका बड्या खासगी बँकेत उघडण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या खात्यांवर सुमारे ५० लाखांहून अधिक रुपयांचे व्यवहार झाले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासणीत ही खाती समोर आली आहे.
चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारलेल्या हवालदाराच्या मोबाईल कॉल डिटेल्समध्ये त्याने कारवाईवेळी केलेला शेवटचा दूरध्वनी खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला केला आहे. त्याच्या खात्यावर २७ हजार रुपये जमा करण्यात येणार होते. लाचलुचपत विभागाच्या पथकाला हवालदाराकडे अंथ्रासीन लावलेल्या नोटांसह रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतरच्या चौकशीत लाच जमा केली जाणारी बँक खाती महत्वाची असल्याचे दिसले. २०१७मध्ये वर्ग चारच्या विविध पदांसाठी झालेल्या भरतीसाठी या १७ लोकांनी 'महत्वपूर्ण कामागिरी' बजाविली होती. लाचखोरीचे 'कलेक्टर' म्हणून प्रसिद्ध असलेल्यांनी भरतीत 'लाख'मोलाचे काम केले. बटालियनच्या ए, बी, सी, डी आणि ई या कंपनीकडून 'मेस अॅडव्हास'ही परस्पर लाटण्यात आला. याची ५० हून अधिक जवानांची सुमारे दोन लाख रुपयांची रक्कम आहे. कंपनी कमाडंटनंतर हत्यार, आवक-जावकची कामे पाहण्यासाठी कॉर्टर मास्तरच्या ड्युटीसाठी वीस हजार रुपये यंत्रणेने घेतले. सेवा पुस्तकातही विविध प्रकारच्या प्रशिक्षणाची नोंद करण्यासाठी जवानांकडून प्रत्येकी ५०० रुपये घेतले जातात असे सांगण्यात येते. जवानांना गोपनीय अहवाल खराब करण्याच्या धमक्याही त्यांच्याकडून दिल्या जात असल्याचे समजते. जवानांची अनेक कामे मर्जीतल्या 'मानसपुत्रा'कडे दिल्याची चर्चा सुरू आहे.
कोऱ्या प्रश्नपत्रिका
'जाऊ तेथे खाऊ' या उक्तीप्रमाणे लाचखोर यंत्रणेने मिळेल त्या कामात जवानांची लुबाडणूक केली. बटालियनच्या अंतर्गत परीक्षेतून कार्यालयाचा स्टाफ निवडला जातो. ही परीक्षा देण्यासाठी वीसहून अधिक जवान परीक्षेस बसले. कार्यालयात मेजर, हवालदार, कम्प्युटर ऑपरेटर, पगारपत्रकी (बाबूजी) या पदांसाठी परीक्षार्थींकडून सुमारे प्रत्येकी वीस हजार रुपये घेण्यात आले. पैसे दिलेल्यांना प्रश्नपत्रिका कोऱ्या ठेवण्यास सांगण्यात आले. परीक्षेच्या निकालाआधी व्यवहार पूर्ण केलेल्यांना ९८ गुण देण्यात आले अशी चर्चा आहे.
(समाप्त)