अ‍ॅपशहर

इस्लामपूरचे ३९ जण निगराणीखाली

शहरातील चौघांना करोना संसर्ग झाल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. प्रशासनाने मंगळवारी अत्यंत बारकाईने नियोजन केले. त्या चौघांच्या संपर्कात आलेल्या ३९ जणांना इन्स्टिट्युटशनल क्वारांटाइन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2020, 6:35 am
म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus


शहरातील चौघांना करोना संसर्ग झाल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. प्रशासनाने मंगळवारी अत्यंत बारकाईने नियोजन केले. त्या चौघांच्या संपर्कात आलेल्या ३९ जणांना इन्स्टिट्युटशनल क्वारांटाइन करण्यात आले आहे. त्या चौघांशी संबंधित ७ लोकांना सोमवारी रात्री मिरज येथील शासकीय रुग्णालयात तर उर्वरित ३२ जणांना मंगळवारी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून, त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. शिवाय शहरातील अन्य २५० जणांना होमक्वारंटाइन केले आहे.

हजहून जाऊन आलेल्या येथील दोन कुटुंबातील चौघांना करोनाची बाधा झाल्याचे सोमवारी सायंकाळी स्पष्ट झाल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले. त्या दोन्ही कुटुंबांच्या घराच्या १५० मीटरवरील चारी बाजू सील करण्यात आल्या आहेत. बसस्थानकावरून शहरात येणारा मुख्य रस्ता, गांधी चौक परिसरात येणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केले आहेत. चार रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यावर इस्लामपुरात यंत्रणा गतिमान झाली.

सोमवारी रात्रीच प्रशासनाने या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना वेगळे केले. त्यांच्या कुटुंबाशी निगडीत ३९ लोकांना इन्स्टिट्युटशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. सुमारे २५० लोकांना होमक्वारंटाइन केले आहे. नगरपालिका प्रशासनाने रात्रीच तो परिसर सील करून औषध फवारणी केली. पोलिस यंत्रणा सतर्क आहेच. सोमवारी रात्री पोलिसांनी शहरात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली. रस्त्यावर फिरणाऱ्या काहीजणांना सौम्य लाठीमार करत पोलिसांनी पिटाळून लावले. वैद्यकीय यंत्रणेमार्फत गणेश मंडई ते गांधी चौक या परिसरातील सर्व लोकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या, त्यांना भेटलेल्या त्यांच्या नातेवाईकांची आणि इतर लोकांची माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नगरपालिका प्रशासनाने या दोन्ही कुटुंबांच्या घराच्या परिसरातच ठिय्या मारला आहे.

संबंधित कुटुंबीय शुक्रवारी १३ मार्चला सौदी अरेबियावरून दिल्ली विमानतळावर आले. तेथे त्यांची तपासणी झाली. तिथून ते विमानाने मुंबईत आले. मुंबई विमानतळावरही त्यांची तपासणी झाली. त्यानंतर ते मुंबईतून खासगी वाहनातून इस्लामपुरात आले. येथील उपजिल्हा रुग्णालयातही तपासणी करण्यात आली. या सर्व तपासन्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह होते. तरीही प्रशासनाने त्यांना बुधवारी १८ मार्चपासून होमक्वारंटाइन केले होते. मात्र अचानक आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागल्याने त्या चौघांना शुक्रवारी २० मार्चला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे विशेष कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान त्यांच्या स्वॅबचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र खळबळ माजली. त्यामुळे सोमवारी रात्री इस्लामपुरात तातडीने संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाली. सर्व रस्ते बंद करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना मज्जाव करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज