म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे ७२ लाख ९० हजार ५१४ रुपये लालफितीत अडकले आहेत. त्यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षातील २ लाख ६४ हजार ९३७ विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या पैशापासून वंचित आहेत. सध्याच्या योजनेतील शिष्यवृत्तीची सर्व रक्कम देण्यात सरकार, प्रशासन अपयशी ठरले असताना मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी नव्या शिष्यवृत्ती, फी सवलतींच्या घोषणा, आश्वासने दिली जात आहेत. परिणामी सरकारच्या विश्वासार्हतेवर विद्यार्थी, पालकांतून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना आणि एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या अकरावी-बारावीतील विद्यार्थ्यांची फी माफी, माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलत, बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पदव्युत्तरपर्यंत मोफत शिक्षण, दहावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण योजनेतून पात्र प्रत्येक विद्यार्थ्यास कमीत कमी १४ रुपये ते अधिकाधिक १५३६ रुपये सरकारकडून दिले जातात.
दरम्यान, प्रवेश प्रक्रियेवेळी पैसे भरून घेतले जातात. सरकारकडून जमा झाल्यानंतर परत केले जातात. त्यासाठी सरकारकडून ७२ लाख ९० हजार ५१४ रुपये माध्यमिक शिक्षण प्रशासनाकडे उपलब्ध झाले आहेत. हे पैसे हायस्कूलच्या बँक खात्यावर जमा केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. मात्र, प्रत्येक हायस्कूलचे बँक खाते घेणे आणि त्यावर पैसे वर्ग करण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी गेल्या वर्षीचे शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले नाहीत. काही योजनांतून मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम नाममात्र आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकही ठोस पाठपुरावा करीत नसल्याचे चित्र आहे.
०००००
निम्या निधीला कात्री
दहावीपर्यंत सर्व मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या योजनेसाठी ३५ लाख ३५ हजार रुपयांची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात या योजनेत १९ लाख २० हजार रुपये मिळाले आहेत. उर्वरित रकमेला सरकारने कात्री लावली आहे. परिणामी शिष्यवृत्तीची रक्कमही विलंबाने मिळूनही सर्व पात्र विद्यार्थ्यांना दिली जाणार नाही. निधी कात्रीमुळे विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.
००००
सरकारने पूर्वीच्या शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांना वेळेत दिलेले नाहीत. आता पुन्हा नव्या शिष्यवृत्ती, फी सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. सरकार केवळ घोषणा, आश्वासने देत जनतेची दिशाभूल करीत आहे. सरकारने खोटा प्रचार करणे बंद करून सर्व योजनांचे पैसे पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर वेळच्या वेळी जमा करावेत.
रमेश मोरे, पालक
००००