म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'बुद्धांच्या विचारांजवळ येण्यास मोठा समाज तयार आहे. त्यांना विविध अंगाने तपासत न बसता सामावून घेण्याची वेळ आली आहे. त्यासाठी देशभरात बुद्धांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करणाऱ्या विविध संघटनांनी आपसातील मतभेद, अहंकार दूर सारून एकत्र येत माणसे जोडण्याची गरज आहे. तसे झाल्यास खऱ्या अर्थाने देश बुद्धमय होईल,' असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी रविवारी व्यक्त केले. पहिल्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात पिंपळाच्या रोपाला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून संमेलनाचे उदघाटन झाले.
डॉ. साळुंखे म्हणाले, 'अखंड ४५ वर्षे कार्यरत राहून बुद्धांनी करूणा आणि मानवतेचा सर्वोच्च संदेश दिला. वंचित, दु:खी वर्गाला आशेचा किरण दिला. आजही जगात बुद्धांचा विचार सर्वश्रेष्ठ मानला जातो. जगभरातील मोठा वर्ग त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली आहे. हा वर्ग बुद्धांच्या कार्याजवळ येण्यासाठी धडपडत आहे. त्यांच्यासाठी मार्ग मोकळा असणे महत्वाचे आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांच्या स्वप्नातील जग निर्माण करण्यासाठी संशोधक, विचारवंतांनी वारंवार एकत्र बसून कृती कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे.'
भदंत गौतमरत्न थेरो म्हणाले, 'अमेरिकेने जातीय विषमता कमी करून विकासाला प्राधान्य दिले. भारतात मात्र अद्याप जातीपातीच्या भिंती घट्ट आहेत. म्हणून देश सर्वांगिण विकासात मागे राहत आहे. वैज्ञानिक आधारावर कोणतीही गोष्ट तपासण्याची शिकवण बुद्धांनी आपल्या विचारांतून दिली. मानव कल्याणाची संकल्पना मांडली. म्हणून विदेशातील अनेक देश बुद्धांचे विचार कृतीत आणत आहेत.'
दिशा पिंकी शेख म्हणाल्या, 'देशात बुद्धांना विशिष्ट वर्गात आणि चाकोरीत बंदिस्त केले गेले. परिणामी विदेशात त्यांचे विचार गतीने पसरले. समाजात स्त्री, पुरुषाशिवाय माझ्यासारखा तृतीयपंथियांचा एक वर्ग आहे. तो अद्यापही उपेक्षित, वंचित आहे. या घटकाला बुद्धांच्या विचारांप्रमाणे न्याय, करूणा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी बुद्ध विहारांमध्ये स्वतंत्र विभाग असावा.'
रत्नश्री म्हणाल्या, 'जगभर धम्म विचारांचा प्रसार करताना आशादायक बदल दिसतो. स्त्री-पुरुष समानतेसाठी त्यांचे विचार कृती आणा.'
अॅड. इंद्रजित कांबळे, मोहन मिणचेकर, अमित मेधावी यांची भाषणे झाली. सागर कांबळे, प्रविण बनसाडे यांनी सूत्रसंचालन केले. सुशिलकुमार कोल्हटकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल म्हमाने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक व्यंकाप्पा भोसले, डॉ. दयानंद ठाणेकर, तात्या कांबळे आदी उपस्थित होते. दरम्यान, शेवटच्या सत्रात डॉ. शिवाजी पाटील, प्रा. टी. एल. पाटील, सतिश भारतवासी यांनी कविता सादर केल्या. भदंत आर. आनंद यांनी बुद्धांच्या कार्याची माहिती दिली. गायक कबीर नाईकनवरे, शाहीर रणजीत कांबळे यांचा कार्यक्रम झाला.
पुस्तक प्रकाशन
कार्यक्रमात प्रा. करुणा मिणचेकर संपादीत 'संविधान मूल्यांकरिता कला, साहित्य, संस्कृती' आणि प्रा. डॉ. चंद्रकांत कदम लिखित 'बाईपासून बाईपर्यंत' या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले. युगप्रवर्तक महागायक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.