म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापुरात खंडपीठाचे कामकाज सुरू व्हावे, या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले असून, आज, मंगळवारी जिल्ह्यातील अडीच हजार वकील कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहणार आहेत. सकाळी अकरा वाजता कसबा बावडा येथे न्यायसंकुलाबाहेर वकील निदर्शने करणार आहेत. वकिलांच्या आंदोलनामुळे ६५ कोर्टामधील सुमारे ६५०० खटले प्रलंबित राहणार आहेत.
कोल्हापूरसह आसपासच्या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात खंडपीठाचे कामकाज सुरू व्हावे, अशी मागणी गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे. पाच वर्षांपू्र्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील खंडपीठासाठी ११०० कोटी रुपयांची घोषणा केली. मात्र, खंडपीठाचे कामकाज सुरू करण्यास सरकारसह न्याय यंत्रणेकडूनही चालढकल सुरू आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी खंडपीठ कृती समितीने पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून, पहिल्या टप्प्यात मंगळवारी जिल्ह्यातील सर्व वकील कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहणार आहेत. जिल्ह्यातील ६५ कोर्टांमधील अडीच हजार वकील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. सकाळी अकरा वाजता सर्व वकील कसबा बावडा येथील न्यायसंकुलासमोर एकत्र येणार आहेत. खंडपीठाच्या प्रश्नाकडे सरकार आणि न्याययंत्रणेचे लक्ष वेधून घेण्यासाठी निदर्शने करणार आहे, अशी माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. रणजित गावडे यांनी दिली.
दरम्यान, वकिलांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ६५०० खटल्यांचे काम ठप्प राहणार आहे. कोर्टात येऊन परत जावे लागू नये, यासाठी पक्षकारांनी मंगळवारी कोर्टात येऊ नये, असे आवाहन जिल्हा बार असोसिएशनने केले आहे.