म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'राजर्षी शाहू महाराजांच्या नावे असलेल्या सारथी संस्थेचे कामकाज पूर्ववत करावे. तारादूत योजना बंद करू नये, अन्यथा सकल मराठा समाज पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल. त्याची सुरूवात कोल्हापुरातून होईल,' असा इशारा सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक वसंतराव मुळीक यांनी गुरुवारी दिला. समाजाच्या शिष्टमंडळातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी चर्चा करताना ते बोलत होते.
समन्वयक मुळीक म्हणाले, 'सरकारकडून सारथी संस्था जाणीवपूर्वक मोडण्याचा प्रयत्न होत आहेत. मराठा आणि बहुजन समाजातील अंधश्रध्दा दूर करण्याचे काम करणाऱ्या तारादुतांना मानधन मिळालेले नाही. यासाठी संबंधीत तारादूत पुणे येथे सारथीच्या कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत. त्यातील पाचजणांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे सरकारने यामध्ये त्वरीत लक्ष घालावे. सारथी संस्थेच्या कामकाजाला चालना द्यावी. याकडे दुर्लक्ष झाल्यास मराठा समाज आंदोलन करेल.'
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनीही या मागणीकडे लक्ष वेधले. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सारथी संस्था सुरू करण्यात आली. मात्र, काहींच्या पूर्वग्रह द्वेषातून संस्था बंद पाडली जात आहे. सारथी संस्थेतर्गंत काम करण्यासाठी राज्यात ३२३ तारादूतांची नियुक्ती केली आहे. ते समाजात प्रबोधनाचे काम करीत आहेत. त्यांना चार महिन्याचे मानधन मिळालेले नाही. ते उपोषण करीत आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने सारथी संस्था वाचवण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांचे थकीत मानधन द्यावे. तारादूत संकल्पना कायमपणे सुरू ठेवावी, सारथी संस्था कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये, त्याच्या स्वायत्तेवर घाला घालू नये, अन्यथा पुन्हा एकदा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर येईल. त्यास सरकार जबाबदार असेल.
निवेदन देताना दिलीप देसाई, शशिकांत पाटील, दिलीप सावंत, विकास जाधव, शरद साळुंखे, अवधूत पाटील, प्रकाश पाटील, सचीन जगदाळे, संग्राम निंबाळकर आदी उपस्थित होते.