फोटो आहे : अर्जुन टाकळकर
पुलाचे काम बंदोबस्तात सुरू
पोलिसांचा फौजफाटा; पूल परिसरातील झाडे, अडथळे दूर
कोल्हापूर टाइम्स टीम
शिवाजी पुलाला पर्याय असलेल्या नवीन पुलाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू आहे. मंगळवारी दिवसभरात पुलाच्या परिसरातील झाडे आणि अडथळे जेबीसीच्या सहाय्याने दूर करण्यात आले. पाच ते सहा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. अपुऱ्या राहिलेल्या पूल बांधकामाची मापे घेऊन गतीने कामाची सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी पूल तयार करण्यासाठी यंत्रणा गतीने कामाला लागली आहे.
सुमारे अडीच वर्षांच्या कालावधीनंतर पर्यायी पुलाच्या बांधकामाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीने पुलाचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता. जिल्हा प्रशासन आणि समितीच्या झालेल्या बैठकीत पर्यायी पुलाचे काम मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन काम सुरू करणार असल्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर समितीने मंगळवारपासून पुकारलेले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मंगळवारी पर्यायी पुलाला जोडणाऱ्या मार्गावरील अडथळे दूर करण्याचे काम सुरू झाले. एक जेसीबी आणि सहा कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कंत्राटदाराने काम सुरू केले आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून कामाला सुरुवात झाली. जेसीबीने हौद पाडण्यात आला. यावेळी दोन ते तीन ठिकाणी दूरसंचार, महावितरणच्या केबल्स आहेत. या केबल्सची माहिती संबंधित विभागाला कळविण्यात आली. सध्या जेबीसी थ्री डी एक्स मशिनरी असून, बुधवारपासून या ठिकाणी मोठ्या मशिनरी आणल्या जाणार आहेत. बांधकाम व्यावसायिकांची क्रिडाई, कॉलिंग कोल्हापूर, अर्थमूव्हर्स, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, गोशिमा यांनी पुलाच्या बांधकामास मदत करण्याची भूमिका घेतली आहे. ४० मीटर पुलाच्या बांधकामासाठी सुमारे २ कोटी ९१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
००
नैसर्गिक आपत्ती वगळता पर्याची पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहे. जेसीबीसह मोठ्या मशिनरी वापरल्या जाणार आहेत. पुलाचे उर्वरित ४० मीटरचे काम पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे.
एन. डी. लाड, कंत्राटदार
००
जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही सुरू केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलिस बंदोबस्त दिला आहे. कोणीही पुलाच्या कामात अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
तानाजी सावंत, लक्ष्मीपुरी पोलिस निरीक्षक
००
जुन्या पुलावरून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. पावसाळ्यापूर्वी पर्यायी पूल वाहतुकीसाठी खुला झाला पाहिजे. त्यासाठी संबंधित यंत्रणेकडून तत्काळ कामकाज पूर्ण करण्याची वेगाने तयारी केली पाहिजे. अन्यथा पुन्हा एकदा शिवाजी पुलावरून अपघाताला निमंत्रण मिळणार आहे.
शरद पाटील, चिखली
०००