म. टा. वृत्तसेवा, सांगली
येथील संजयनगर येथील मरगुबाई मंदिरात ४० वर्षांपासूनची रेडाबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. संजयनगर पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समिती, यात्रा समिती आणि प्राणीमित्र संघटनांची बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला. पहाटेच्या सुमारास रेडा बळी दिला जायचा.
दरम्यान, ‘अंनिस’ने पुढकार घेतल्याने जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथे यात्रेत सुरू असलेली रेडाबळीची प्रथाही बंद करण्याचा निर्णय झाला. ‘अंनिस’, प्राणिमित्र आणि ग्रामस्थ व पोलिस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. ग्रामसभेत तसा ठराव मंजूर करण्यात आला. काही दिवसांपूर्वी जत तालुक्यातील हळ्ळी येथील रेडाबळीची प्रथा बंद झाली होती. आता गोंधळेवाडीची प्रथाही बंद झाली आहे.
अंनिसचे डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, १९९३मध्ये सांगलीतील नवीन वसाहतीसह तासगाव तालुक्यातील काही गावांतील प्राणीबळीची प्रथा बंद करण्यात यश आले आहे. आरेवाडी यात्रेतील हजारो बोकडांची कत्तल प्रबोधनामुळे कमी प्रमाणात आली आहे. उघड्यावर प्राण्यांची कत्तल करता येत नाही. नियमावलानुसार अधिकृत कत्तलखान्यात कापण्यायोग्य प्राणी आणावा लागतो. त्याची पशुवैद्यकीय अधिकारी चाचणी करतात. या नियमावलीचा भंग केल्यास दंड आणि साडेचार वर्षांपर्यंत शिक्षेची कायद्यात तरतूद आहे.