म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'जिल्हा वार्षिक योजनेतील विविध योजनांची खर्चाची प्रशासकीय मंजुरी महिनाअखेरपर्यंत द्यावी', असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी शुक्रवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते.
देवरा म्हणाले, 'प्राथमिक आरोग्य केंद्रावरील सौर ऊर्जेची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. समाज कल्याण विभागाने ५० टक्के निधी जुलैअखेरपर्यंत खर्च करावा. वृक्ष लागवड कार्यक्रमातर्गंत लावलेली झाडे किती जिवंत आहेत, त्याचे सर्व्हेक्षण करावे. '
समाज कल्याण निरीक्षक संजय पवार यांनी विशेष घटक योजनेची तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली. विभागीय वन अधिकारी दिपक खाडे यांनी ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत माहिती दिली. महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी राजाराम तलाव येथे मियावॉकीच्या धर्तीवर वृक्षारोपन करण्यात येईल, असे सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, प्रातांधिकारी सचिन इथापे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई आदी उपस्थित होते.