मिरज : येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांचे देणे असलेली ५२ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी कारखान्याच्या मालमत्तेवर सरकारच्या नावाच्या नोंदी चढवाव्यात, असा आदेश तहसीलदार शरद पाटील यांनी दिला आहे.
सन २०१३-१४ वर्षात वसंतदादा साखर कारखान्याने ऊस उत्पादकांचे ४६. ३९ कोटी रुपयांचे ऊस बिलाचे तसेच इतर देणी थकीत ठेवली होती. साखर आयुक्तांनी थकित बिल वसुलीसाठी कारखान्याची मालमत्ता जप्ती आणि विक्रीद्वारे देणी भागविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार महसूल वसुली प्रक्रिया सुरू करून कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आला आहे.
मालमत्ता जप्तीच्या तीन नोटिस कारखान्याला बजावूनही थकबाकी वसुली झाली नाही. त्यामुळे थकीत ५२ कोटी रुपये वसुलीसाठी कारखान्याची इमारत वगळता इतर मालमत्ता लिलावाद्वारे विकण्यासाठी महसूल विभागाने २६ ऑक्टोबर रोजी लिलाव आयोजित केला होता.
मात्र, लिलावाला खरेदीदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून कारखाना मालमत्तेच्या सातबारा उताऱ्यावर मालक म्हणून सरकारच्या नावाची नोंद करण्यासाठी तहसीलदार शरद पाटील यांनी मंडल अधिकाऱ्यांना आदेश
दिले आहे.