म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'देशातील सद्यस्थिती पाहिली तर विद्यार्थ्यांनी संघर्षासाठी तयार राहण्याची गरज आहे. अभ्यास व संघर्ष या दोन्ही बाजू सांभाळत पुढे जाणे आणि देशाचे भवितव्य घडविणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे. संघर्ष हा चांगल्या विचारांचा आणि कृतींचा असला पाहिजे, ज्याद्वारे समाजाचे भले होईल,'असे मत इएफएल विद्यापीठाच्या माजी प्रकुलगुरू डॉ. माया पंडित यांनी व्यक्त केले.
स्टुडंडस फेडरेशन ऑफ इंडियाचे २१ वे जिल्हा अधिवेशन रविवारी झाले. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे सहकार्यवाह प्रा. सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. चित्रदुर्ग मठ येथे हे अधिवेशन झाले.
'इतर देशात उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणांची टक्केवारी ५५ ते ६० टक्के तर भारतात तेच प्रमाण २० ते २५ टक्के आहे. सरकारने या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे,'असे डॉ. पंडित यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या 'आमच्यामध्ये माफीवीर सावरकरांचे रक्त नाही. तर शेतकरी, भूमिहीन व ग्रासलेल्या नागरिकांना स्वातंत्र्य देण्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे रक्त आमच्यात आहे.' याप्रसंगी प्रा. जाधव, एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांची भाषणे झाली.
....
अधिवेशनातील प्रमुख ठराव....
नोकरभरतीवरील बंदी तत्काळ उठवावी.
नवीन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९ मध्ये मुलभूत सुधारणा कराव्यात.
शिष्यवृत्तीमध्ये वाढ, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी बस पास, सरकारी विद्यापीठांचे सक्षमीकरण.
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी रद्द करावा.
लोकशाही पध्दतीने विद्यार्थी निवडणुका घेण्याच्या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करावी.
.....
जिल्हाध्यक्षपदी सर्वेश सवाखंडे
अधिवेशनात जिल्हास्तरीय १९ जणांची कार्यकारिणी निवडण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी सर्वेश सवाखंडे, जिल्हा सचिवपदी रत्नदीप सरोदे, जिल्हा उपाध्यक्षपदी नवनाथ मोरे, पंकज खोत, तर जिल्हा सहसचिवपदी प्रेरणा कवठेकर, तुषार सोनुले यांची निवड झाली. सदस्यपदी मालोजीराव माने, अविकुमार पाटील, रणजित माने, अभिषेक शिंदे, केतन पाटील, प्रमोद मोहिते, विनय कोळी, गणेश भालेराव, केदार शिकलगार, राज शिकलगार, सौरभ जाधव, प्रवीण पुजारी, हरी आवळे आदींची एकमताने निवड झाली.