म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी अलिबाग कोर्टात चौघा संशयित आरोपींवर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी शनिवारी दोषारोपत्र दाखल केले. अपहरण, कटकारस्थान, खून करून पुरावा नष्ट करणे, खोटी कागदपत्रे सादर करणे आदी आरोप वकिलांनी दोषारोपपत्रात केला आहे. सरकारी वकिलांनी ६५० पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. दरम्यान कोर्टाने आरोपींच्या वकिलांना तीन जून रोजीची युक्तिवाद मांडण्याची मुदत दिली आहे.
बिद्रे हत्याकांड प्रकरणात मे महिन्यात झालेल्या सुनावणीला चौघेही संशयित गैरहजर राहिले होते. याप्रकरणी सरकारी वकील अॅड. घरत यांनी मुंबई पोलिस सहकार्य करीत नसल्याचा आरोप करून नवी मुंबई पोलिस आयुक्त संजीवकुमार यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांचे सहकार्य मिळाले नसल्यास त्यांनी हा खटला सोडण्याचा इशारा दिला होता. दरम्यान या खटल्याची सुनावणी शनिवारी सुरू झाली. अलिबाग कोर्टात सकाळी मुख्य सूत्रधार अभय शामसुंदर कुरुंदकर (रा. भाईंदर पूर्व, जि. ठाणे), माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव दत्तात्रय पाटील उर्फ राजू पाटील (रा. तळवेल, ता. भुसावळ, जि. जळगाव), कुरुंदकरचा कारचालक कुंदन भंडारी, कुरुंदकरचा बालपणीचा मित्र महेश पळणीकर (रा. आजरा) चौघांनाही हजर करण्यात आले. अॅड. घरत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुनावणी सकाळी साडेअकरा वाजता कोर्टात सुरू झाली. अश्विनी ब्रिदे यांची हत्या या चौघांनी कट रचून केली आहे. त्याचे अपहरण करुन खूनाचा कट रचला. बिद्रे यांचा खून करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकला. पुरावा नष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. खोटी कागदपत्रे सादर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप युक्तिवादात केला आहे. त्यामुळे संशयितांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली. दरम्यान आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद मांडण्यासाठी ६ जूनची मुदत मागितली होती. मात्र कोर्टाने त्यांना ३ जून रोजीची मुदत दिली आहे.
अखेर मुंबई पोलिस हजर झाले
यापूर्वी आलिबाग कोर्टात झालेल्या सुनावणीच्या वेळी तपास अधिकारी गैरहजर होते. त्यावरून पोलिसांकडून अप्रत्यक्ष आरोपींना मदत होत असल्याचाही संशय अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी व्यक्त केला आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीस तपास अधिकारी हजर राहिले.