प्रवीण कांबळे, हातकणंगले
कोल्हापूर जिल्ह्याची वरददायिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या पंचतारांकित औद्योगिक वसाहत, लक्ष्मी इंडस्ट्रीज या औद्योगिक वसाहतीचे प्रक्रिया न केलेले केमिकल मिश्रित सांडपाणीपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे नदीकाठावरील गावांना काळ्या पाण्याची शिक्षा मिळत आहे. मध्यंतरी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन प्रदूषणास कारणीभूत असलेल्या घटकांवर कारवाई करण्याबाबत सूचना देऊनही त्यावर कार्यवाही झालेली नाही.
संपूर्ण देशात सर्वात जास्त प्रदूषित असलेली नदी म्हणून पंचगंगा नदीचा उल्लेख केला जातो. कोल्हापूर शहर, पंचतारांकीत औद्योगिक वसाहत, लक्ष्मी इंडस्ट्रीज, इचलकरंजी शहर आदींच्या केमिकलमिश्रित पाण्याने पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. यामुळे हातकणंगले तालुक्यातील रुकडी, माणगाव, साजणी, तिळवणी, रुई, चंदूर आदी गावातील शेतजमिनींवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. पाणी दुषित झाल्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना त्वचारोग, कॅन्सर, पोटाचे विकार आदी रोगांनी ग्रासले आहे. या विरोधात पंचगंगा नदी काठावरील गावांनी सलग २२ दिवस जनआंदोलन उभारून साखळी उपोषण केले. तसेच रुकडीतील मच्छीमारांनी पंचगंगा नदीच चोरीला गेल्याची तक्रार हातकणंगले पोलिस ठाण्यात दिली. यामुळे हे आंदोलन राज्यभर गाजले.
पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्या पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीसह लक्ष्मी इंडस्ट्रीज, इचलकरंजी शहरातील काळा ओढा, इंगळी व पट्टणकोडोली ओढा आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन या गंभीर प्रकारणांची दखल घेत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नदीकाठावरील इचलकरंजी शहर, लक्ष्मी इंडस्ट्रीज, पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीसह कोल्हापुरातील जयंती नाला या प्रत्यक्ष भेटी दिल्या. येथील गंभीर स्थिती पाहून संतापलेल्या मंत्री रामदास कदम यांनी या प्रदूषण करणाऱ्या घटकांना वारंवार वाचवणाऱ्या प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या 'प्रदूषण'च्या अधिकाऱ्यांनी फक्त लक्ष्मी इंडस्ट्रीज मधील युनिरोज प्रोसेस हा कारखाना बंद करण्याचे आदेश देत कारवाई केली होती.
महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रदूषित असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी नदीकाठावरील गावांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांच्या पुढाकाराने पंचगंगा बचाव कृतीची स्थापना करून सलग २२ दिवस साखळी उपोषण तसेच रुकडीतील मच्छीमार बांधवांनी पंचगंगा नदी चोरी गेल्याची तक्रार हातकणंगले पोलिस ठाण्यात देऊन प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रदूषणाच्या मुद्यावर हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील जनतेत मोठ्या असंतोष निर्माण झाला होता. वारंवार तक्रारी करुन देखील प्रदूषणच्या अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षाने कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामाची पद्धती सर्वत्र चर्चेत आली.यामुळे वैतागलेल्या लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेतून नाराजीचा सूर उमटत होता.
सध्या पंचतारांकित औद्योगिक वसाहत व लक्ष्मी इंडस्ट्रीज मधील केमिकल मिश्रीत सांडपाणी प्रक्रिया न करता थेट पंचगंगा नदीत अजूनही मिसळत असल्याचे चित्र दिसून असून नदीकाठच्या गावांना काळ्या पाण्याची शिक्षा देणाऱ्या या औद्योगिक वसाहतीवर ठोस कारवाई करण्याची मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नेमके काय काम करतात? हा संशोधनाचा विषय बनला असून येत्या काळात काही संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे समजते.
रुई बंधाऱ्यांवर दुर्गंधी
लक्ष्मी इंडस्ट्रीजमधील केमिकल मिश्रीत फेसाळलेले सांडपाणी प्रक्रिया न करता थेट पंचगंगेत मिसळत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. रुई बंधाऱ्यांवर या सांडपाण्याची दुर्गंधी पसरली आहे.
तळंदगे पितेय विषारी पाणी
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या केमिकल मिश्रित पाणी ओढ्याच्या माध्यमातून जाते. या पाण्यामुळे शेजारील तळंदगे गाव अक्षरशः विषारी झाले असून परिसरातील गवत, चारा खाऊन अनेक जनावरे दगावली असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते.
०००००००००००
फोटो ओळी: रुई बंधाऱ्यांवर लक्ष्मी इंडस्ट्रीज मधील फेसाळलेले केमिकल मिश्रीत सांडपाणी प्रक्रिया न करता थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे.