म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'बोगस बियाणे आणि खतांचा पुरवठा करून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत. त्यांना काळ्या यादीत टाकावे. यामध्ये कुचराई केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले जातील', असा इशारा कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरूवारी दिला. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यातील कृषी योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. डॉ. बोंडे म्हणाले, बोगस बियाणे, खते पुरवलेल्या कंपन्यांविरोधात जे शेतकरी ग्राहक न्यायालयात गेले आहेत, त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने पाठपुरावा करावा. साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर अधिक भर द्यावा. कृषी सहाय्यक ग्रामपंचायतीमध्ये बसतात की नाही, त्याचा अहवाल सादर करावा.'
यावेळी आमदार अमल महाडिक यांनी कृषी औजार बँकेचा उपक्रम राबवावा, अशी मागणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, सहनिबंधक अरूण काकडे यांनी पीक कर्जाची माहिती दिली. उपसंचालक भाग्यश्री पवार यांनी स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, आमदार शिवाजीराव नाईक, विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. कृषी अधिकारी उमेश पाटील यांनी आभार मानले.