कोटीतीर्थ येथे विसर्जनानंतर प्रमाणपत्र
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कोटीतीर्थ तलाव येथे गणरायाची विधीवत पूजा झाल्यानंतर छोट्या काहिलींमध्ये विसर्जन करण्यात आले. मूर्तीदान केलेल्या भाविकांची नोंद करुन शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभाग व महापालिकेकडून भाविकांना प्रमाणपत्र देवून गौरव केला जात होता. कोटीतीर्थ तलावावर जल्लोषपूर्ण वातावरणात आणि ढोलताशांच्या गजरात भाविक कुटुंबासह दाखल होत होते. भाविकांनी तलावात मूर्ती विसर्जन न करता काहिलीमध्ये करण्यासाठी नारायणदास मठ व स्वामी समर्थ मंदिराशेजारी प्रत्येकी दोन काहिली ठेवल्या होत्या. काहिलीमध्ये भाविकांनी मूर्ती विसर्जीत करत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, सेव्ह कोल्हापूरचे सुरेश मिरजकर यांच्यासह विद्यार्थी व महापालिका कर्मचारी भाविकांना मूर्तीदान करण्याचे आवाहन करत होते.
प्रचंड वाहतूक कोंडी
कोटीतीर्थ तलावावर मूर्ती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात. तलावाकडे येणारा शाहू मील व उद्यमनगर येथील रस्ता बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद केला होता. परिणामी भाविकांनी तलावापासून लांब वाहनांचे पार्किंग केले. पण अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. वाहतूक पोलिस वाहनचालकांना सूचना करीत होते. मात्र त्याकडे वाहनधारकांनी दुर्लक्ष केले.