सतत मोबाइल फोनमधील गेम्समध्ये हरवलेल्या मुलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नोकरदार पालक, विभक्त कुटुंब पद्धती, मैदानी खेळांपासून दुरावा, कुटुंबातील संवादाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे मोबाइल गेम्समध्येच तासनतास मग्न असलेली मुलं ही सध्याची गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. पाच वर्षांपासून वीस वर्षांपर्यंतच्या मुलांभोवती ऑनलाइन गेम्स व सोशल मीडियाचा विळखा घट्ट होत आहे. यामधून मुलांमध्ये एकलकोंडेपणा वाढण्याचा धोका अभ्यासकांकडून वर्तवला जात आहे. या महत्त्वाच्या विषयाचा वेध घेणारी मालिका आजपासून.
Anuradha.kadam@timesgroup.com
Tweet@AunradhakadamMT
कोल्हापूर : ज्या वयात दम लागेपर्यंत खेळायचे, घाम गळून कडाडून भूक लागेपर्यंत हुंदडायचे, मैदानावरच्या खेळांपासून ते बैठ्या खेळापर्यंत चुरशीचा अनुभव घ्यायचा, हार जीत यापलीकडे जात खिलाडूवृत्तीची बीजे अंगी भिनवायची अशा वयातील मुलांचे बालपण मोबाइल गेम्सच्या विळख्यात पूर्णपणे करकचून गेले आहे. मोबाइल फोनमधील सात इंच स्क्रीनच्या खेळात अडकलेल्या मुलांची ऑनलाइन गेम्समधील आभासी जिंकण्यासाठी लागणारी स्पर्धा त्यांना मानसिक एकलकोंडेपणाच्या गर्तेत ढकलत आहे.
मोबाइल गेम्सवर तासनतास गढून गेलेली शालेय व महाविद्यालयीन वयातील मुलं ही आजच्या प्रत्येक घरातील पालकांच्या काळजीचे कारण बनली आहेत. मोबाइलवर खेळले जाणारे ऑनलाइन गेम्समधील वेग आणि त्यातील जिंकण्याचा आनंद मुलांच्या आकर्षणचा केंद्रबिंदू आहे. सध्या मोबाइलवर दहा ते पंधरा प्रकारचे गेम्स वयाच्या पाच ते १९ वर्षे वयाच्या मुलांना आकर्षित करणारे आहेत. यामध्ये पझल्स, आर्केड गेम, अॅडव्हेंचर अॅक्शन, बोर्ड गेम आणि बॅटल रॉयलचा समावेश आहे. 'पोकेमॉन गो' या गेमने सर्वांना अक्षरश: वेड लावले होते. कँडी क्रश, क्वाइन मास्टर आणि आता पब्जीच्या विळख्यात तरुणाई गुरफटली आहे. त्यातून मुलांना यातून बाहेर काढण्यासाठी सामाजिक स्तरावर प्रयत्न होण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.
सतत हे गेम्स खेळणाऱ्या मुलांच्या डोळ्यावर, मनावर व मानेवर येणारा ताण तर धोकादायक आहेच पण या गेम्समध्ये जिंकण्यासाठी जो टेम्पो दिला जातो त्यातून त्यांच्यात आक्रमकपणा वाढत असल्याची निरीक्षणे मनोविकार व मानसिक आरोग्यतज्ज्ञांकडून अधोरेखित होत आहेत. पब्जी, ब्ल्यू व्हेल्स या सारख्या खेळांमध्ये अवास्तव धाडस करण्याचे आव्हान दिले जात असल्याने त्यातून अवाजवी पाऊल उचलण्याचे प्रकार मुलांमध्ये वाढत आहेत. या खेळांमध्ये अयशस्वी झाल्यास त्यातून मुलांमध्ये नैराश्य येत आहे. या नैराश्यातून आत्महत्येपर्यंतचे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या मुलांची वाढती संख्या हा सामाजिक प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोबाइल गेम्स खेळणाऱ्या मुलांची मानसिक स्थिती असंतुलित होत असल्याच्या निरीक्षणावरही शिक्कामोर्तब होणाऱ्या घटना विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत.
कोट
सतत मोबाइल फोनमधील गेम खेळण्यात व्यस्त असलेल्या मुलांमध्ये मानसिक कमकुवतपणा येण्याची शक्यता जास्त आहे. फोनमधील लहरींचा मेंदू व हृदयावरही परिणाम होतो. हे एक व्यसन असून ते मिळाले नाही तर मानसिक संतुलन हरवल्याने मुलांचा मनावरीलताबा सुटतो. काल्पनिक व वास्तव जग यातील फरक न कळल्याने मुलं नैराश्याच्या खाईत जातात. यातून जीवन संपवण्यापर्यंतचा विचार मनात येतो. व्यक्तीगत खेळापेक्षा सामूहिक खेळातील अपयश अधिक धोकादायक आहे.
- प्रा. अनिल घस्ते, मानसशास्त्र अभ्यासक
पॉइंटर
काय आहेत धोके
- सतत गेम्स खेळल्याने आक्रमकपणा वाढ
- नकार पचवण्याची क्षमता कमी
- स्वभावातील उद्धटपणात वाढ
- अवास्तव धाडस करण्याची चुकीची मानसिकता
- शारीरfक व मानसिक ताणामुळे चिडचिड
- विचार प्रक्रिया थंडावल्याने बौद्धिक अक्षमता
- कुटुंबापासून अलिप्त राहिल्याने असंवेदनशीलतेत वाढ