म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
पूरग्रस्तांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान वर्ग करण्यास असमर्थता दाखविणाऱ्या शिरोळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियामधील खाते बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिले. सरकारी योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांमधील सर्व शासकीय खाती बंद करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी देसाई यांनी शुक्रवारी शिरोळ तहसील कार्यालयात पूरग्रस्तबाधितांच्या मदत वाटपाचा आढावा घेतला. त्यावेळी शिरोळ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खात्यावरुन पूरबाधित कुटुंबांना विविध प्रकारचे सानुग्रह अनुदान बल्क ट्रान्स्फरद्वारे संबंधिताच्या खात्यावर वर्ग करण्यास असमर्थता दर्शविल्याचे निदर्शनास आले. पूरग्रस्तांना मदत म्हणून दिलेल्या सर्व रक्कमा बाधित कुटुंबांच्या खात्यावर जमा झाल्याबाबत ताळमेळ घेवून बँक शाखेतील खाते बंद करण्याचे आदेश दिले. पूरबाधित कुटुंबांना तात्काळ अनुदान मिळण्यासाठी सद्यस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ मिळालेले सर्व अनुदान जयसिंगपूर येथील बँक ऑफ इंडिया शाखा येथे खाते उघडण्यास परवानगी दिली. याबाबत परवानगीचे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी तत्काळ शिरोळ तहसीलदारांना पाठवले आहे.