कोल्हापूर टाइम्स टीम
'महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजप, ताराराणी आघाडी अभेद्य होती. आमचे ३३ नगरसेवक आघाडीसोबत प्रामाणिक राहिले. आम्ही सत्तेसाठी घोडेबाजार केला नाही. याउलट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्या नगरसेवकांची मनधरणी करावी लागली, त्यांच्यासोबत राहावं लागले. पैसे खर्च करावे लागले यावरुन घोडेबाजार कुणी केला हे सिद्ध झाले,' असा आरोप भाजप, ताराराणी आघाडीचे नेते माजी महापौर सुनील कदम यांनी केला. 'सत्तेसाठी आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांना महापालिकेच्या प्रवेशव्दारापर्यंत धावाधाव करावी लागली, ' असा टोलाही त्यांनी लगावला.
नवीन महापौर व उपमहापौरांनी शहर विकासासाठी योग्य काम करावे, चांगल्या कामासाठी आमचा पाठिंबा राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. महापौर निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, 'महापौर निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना घाम फोडण्याचे काम भाजप, ताराराणी आघाडीने केले. आमचे सदस्य कुठल्याही आमिषाला बळी पडले नाहीत. उलट दोन्ही काँग्रेसमध्येच प्रचंड अस्वस्थता होती. काँग्रेसच्या माजी महापौर अश्विनी रामाणे यांचा जातीचा दाखला बोगस निघाला, त्यांनी जातीच्या दाखल्याचे प्रमाणपत्र अद्याप सादर केले नाही. त्यांनी बोगस दाखल्याव्दारे निवडणूक लढवली, त्या पदासाठी लायक नव्हत्या.तरीही काँग्रेसच्या नेत्यांनी अडीच वर्षापूर्वी त्यांना महापौर करुन कोल्हापूरच्या नागरिकांचा अपमान केला.'पत्रकार परिषदेला स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, गटनेते सत्यजित कदम, अजित ठाणेकर, ईश्वर परमार, विजय खाडे, किरण नकाते आदी उपस्थित होते.
मुश्रीफ काहीही बोलतात
आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचाही माजी महापौर कदम यांनी समाचार घेतला. मुश्रीफ हे काय पण बडबडत आहेत. त्यांच्या स्वतकडे काही राहिले नाही. ते माजी मंत्री आहेत, त्यांच्याबद्दल जास्त बोलणे उचित नाही. महापौर निवडीवेळी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांनीच कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या वर्तणुकीमुळे महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर त्यांना अपमानित व्हावे लागले. पोलिस प्रशासनाने जबाबदारीने कर्तव्य बजावले.
क्षीरसागरांचा कल काँग्रेस-राष्ट्रवादीकडे
शिवसेनेच्या तटस्थ भूमिकेविषयी विचारले असता भाजपा गटनेते विजय सुर्यवंशी म्हणाले, 'शिवसेनेने प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी भूमिका घेतली आहे. पुढील निवडणुकीत सेना नेत्यांना नक्की भेटू.' तर विरोधी पक्षनेते विलास वास्कर म्हणाले,'शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा कल पहिल्यापासून दोन्ही काँग्रेसकडे होता. म्हणून निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिली.'