म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शनिवारी मुंबईत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे ११ दिवसांनंतरही संप सुरू ठेवण्याचा निर्धार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या वतीने केला.
जिल्हा परिषदेसमोर कंत्राटी कर्मचारी दररोज धरणे आंदोलन करत आहेत. आंदोलनाची दखल घेऊन राज्यस्तरावर चर्चेसाठी दोनवेळा बैठकीचे नियोजन केले होते. पण बैठकच होऊ न शकल्याने शनिवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दुपारी आरोग्य मंत्री दीपक सावंत, आयुक्त संजीव कुमार, महासंघाचे अध्यक्ष नंदू दातार, उपाध्यक्ष विजय सोनवणे आदी सहभागी झाले होते. बैठकीला कोल्हापुरातून पाच प्रतिनिधी गेले होते. सायंकाळी सात वाजता मागण्या मान्य केल्याचे सरकारच्या वतीने स्पष्ट केले, पण लेखी आश्वासन देण्यास नकार दिला. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत बंद मागे न घेण्यावर ठाम राहिले. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत महासंघाचे पदाधिकारी लेखी आश्वासनाच्या प्रतीक्षेत होते. शेवटी लेखी आश्वासन न मिळाल्याने, बेमुदत संप सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.
आंदोलनात इम्रान जमादार, संदीप पाटील, इंद्रजित पाटील, हेमंत इंगवले, सुनील खपटे, एस. पी. कुकडे, सलमा पठाण, लता मटकर, पूनम चौगुले, सीमा कदम, उमा पाटील आदी कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते.