अ‍ॅपशहर

दक्षिण महाराष्ट्रात करोनाचे वाढते संकट, तीन जिल्ह्यांत ३३५९ रुग्ण

करोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यानंतर त्याचा शिरकाव होऊ नये, यासाठी राज्याच्या दक्षिणेकडील सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांनी विशेष खबरदारी घेतली होती. राज्याच्या तुलनेत दक्षिण महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी आहे.

Authored byउद्धव गोडसे | Edited byसचिन फुलपगारे | Maharashtra Times 11 Jul 2020, 8:48 pm
राज्यात करोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात काही काळ यश मिळवलेल्या दक्षिण महाराष्ट्राची संसर्गावरील पकड हळूहळू निसटत चालली आहे. गेल्या १५ दिवसात सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तिन्ही जिल्ह्यातील रुग्णसंख्या सव्वातीन हजारांवर गेल्याने समूहसंसर्गाचा धोका वाढला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus update cases increasing in sangli satara and kolhapur
दक्षिण महाराष्ट्रात करोनाचे वाढते संकट, तीन जिल्ह्यांत ३३५९ रुग्ण


करोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यानंतर त्याचा शिरकाव होऊ नये, यासाठी राज्याच्या दक्षिणेकडील सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांनी विशेष खबरदारी घेतली होती. संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासह जिल्हाबंदीही गांभीर्याने सुरू आहे. मात्र, मुंबई आणि पुण्यातील हॉटस्पॉटमधून मूळ गावाकडे परतलेले नागरिक करोनाचे वाहक बनल्याने दक्षिण महाराष्ट्रात संसर्ग वाढला. शनिवारी दुपारपर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण १६०१ रुग्णांची नोंद झाली. कोल्हापुरात ११४१, तर सांगलीत ६१७ रुग्णांची नोंद झाली. सातारा जिल्ह्यातील ९०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. कोल्हापुरातील ८०४, तर सांगलीतील २९८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ६५ रुग्ण दगावले. कोल्हापुरात २३, तर सांगलीत १६ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्याच्या तुलनेत दक्षिण महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने जनजीवन पुन्हा ठप्प होत आहे. सरकारकडून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक आहे. विशेष म्हणजे नव्याने आढळणा-या रुग्णांची ट्रव्हल हिस्ट्री करोनाबाधितांच्या संपर्कातील मिळत नसल्याने आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत भर पडली आहे. हा समूहसंसर्गाचा टप्पा असल्याचे मत काही तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. यामुळेच दक्षिण महाराष्ट्राची चिंता आणखी वाढली आहे.

चित्रीकरणांना फटका बसण्याचा धोका

अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच सरकारने मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणाला सशर्त परवानगी दिली आहे. यानुसार कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही मालिकांचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले. मुंबईत करोनाचा कहर सुरू असल्याने काही हिंदी मालिकांचेही चित्रीकरण दक्षिण महाराष्ट्रात करण्याचा विचार निर्माते आणि दिग्दर्शकांकडून सुरू आहे. मात्र, दक्षिण महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास सुरू असलेले चित्रीकरणही थांबण्याचा धोका आहे.

उद्योगांवर गंभीर परिणाम

मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून बंद असलेले उद्योगधंदे हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. पुणे, मुंबईतील हॉटस्पॉटमुळे अजूनही दक्षिण महाराष्ट्रातील उद्योगांना अपेक्षित गती आलेली नाही. यातच रुग्णसंख्या वाढत असल्याने कंटेनमेंट झोनमधील उद्योग बंद ठेवावे लागत आहेत. याचा गंभीर परिणाम फाउंड्री, इंजिनीअरिंग उद्योग आणि वस्त्रोद्योगावर सुरू आहे.

तिन्ही जिल्ह्यातील रुग्णसंख्या
सातारा – १६०१
कोल्हापूर – ११४१
सांगली – ६१७

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज