म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'भारतीय कम्युनिस्ट पक्ष इतर डाव्या पक्षांसोबत आघाडी करुन विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यासाठी मुंबई येथे गुरुवारी (ता.१९) राज्यस्तरीय प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील विधानसभा मतदारसंघ आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यासाठी शनिवारी (ता. २१) दुपारी १२ वाजता शाहू स्मारक भवन येथे मेळावा होणार आहे,' अशी माहिती पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
कांबळे म्हणाले, 'अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा, शाहू मिल, शहरातील रस्ते, वाहतूक व कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. सरकारमधील वजनदार मंत्री कोल्हापुरात होणाऱ्या सततच्या आंदोलनामुळे विकास प्रकल्प आले नसल्याचे सांगत शहरवासियांना दोष देत आहेत. त्यांनी असे किती प्रकल्प आंदोलनामुळे आले नाहीत, त्याची यादी जाहीर करावी. तर 'उत्तर'चे आमदार शहरातील प्रश्न तडीस न लावता स्वत:च सत्तेत असून आंदोलन करत आहेत. शहराचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी डाव्या विचारांचे उमेदवार विधानसभेत पाठवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व डाव्या पक्षांना सोबत घेवून विधानसभा निवडणूक लढवण्यात येणार आहे. शनिवारी होणाऱ्या मेळाव्यात स्मिता पानसरे, राम बाहेती व राज्य सेक्रटरी नामदेव गावडे मार्गदर्शन करणार आहेत.'
जिल्हा सहसचिव गिरीष फोंडे म्हणाले, 'पुरामुळे पडझड झालेल्या शहरातील कुटुंबांचा सर्व्हे केला आहे. अशा कुटुंबांना मेळाव्यादरम्यान धनादेशाचे वितरण करण्यात येणार आहे.' पत्रकार बैठकीस अनिल चव्हाण, बी. एल. बरगे, दिनकर सूर्यवंशी, नामदेव पाटील, दिलदार मुजावर आदी उपस्थित होते.