धार्मिक विधींना हवा फाटा
००००
सोमवार, अमावस्या, पौर्णिमेला नदीची पूजा करण्याऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पूजेवेळी वापरण्यात येणारी खाऊची पाने, केळी, हरभरे, दहीभात हे सर्व घटक नदीत विसर्जित केले जातात. त्यामुळे नदी प्रदूषित होते, अशी तक्रार स्थानिक मासेमारी करणाऱ्यांकडून होत आहे. पण धार्मिक विधी असल्याने अटकाव होऊ शकत नाही. धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी नदी पूजेमुळे होणारे प्रदूषण व त्यावरील पर्यायावर मार्गदर्शन केले तर प्रदूषणाला अटकाव होऊ शकतो.
००००
विविध धार्मिक सण, कार्यक्रम आणि विधींमुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. धार्मिक विधीला फाटा देऊन नद्यांचे
प्रदूषण होऊ नये यासाठी निर्माल्य दान, मूर्तिदान, रक्षा कुंड, निर्माल्य कुंडासारख्या उपाययोजनांमुळे पाणी प्रदूषण होऊ नये यासाठी चांगले प्रयत्न सुरू आहेत.
पंचगंगा नदी परिसरात वर्षभर विविध धार्मिक विधी केले जातात. धार्मिक भावनेतून देवपूजा, सत्यनारायण पूजेतील निर्माल्याचे विसर्जन पंचगंगेत केले जाते. पण प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर 'निर्माल्य दान' ही संकल्पना अस्तित्वात आली. निर्माल्य दान करण्यासाठी निर्माल्य कुंडही उभारण्यात आले. सध्या पंचगंगा व रंकाळ्यावर निर्माल्य कुंडाची उणीव भासत आहे. पंचगंगा नदीवरही पोहायला येणारी मंडळी व परिसरातील नागरिक पंचगंगा नदीत निर्माल्य टाकणाऱ्यांना हटकून नदीच्या बाहेर निर्माल्य ठेवण्यास सांगतात. वास्तुशास्त्रामुळे व काही धार्मिक सल्ले देणाऱ्या मंडळींकडून घरातील देवांच्या मूर्ती नदीत विसर्जित करण्याचे प्रकार घडत आहेत. पितळी मूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्यानंतर त्या मूर्ती पाण्याबाहेर काढून विक्री करणारी मंडळीही नदीवर आहेत. पण देवदेवतांचे फोटो व प्लास्टर मूर्ती यांचे विसर्जन कुठे करायचे याची माहिती नसल्याने नदीवर फोटो व मूर्ती जागोजागी दिसून येतात.
गणेशोत्सवात निर्माल्य दान व मूर्ती दान या दोन्ही उपक्रमांची सुरुवात कोल्हापुरातून झाली. त्याचा प्रसार देश व राज्यभर झाला आहे. गेली २८ वर्षे मूर्ती व निर्माल्यदानाला प्रतिसाद मिळत असल्याने २०१७ मध्ये जिल्ह्यात चार लाखांहून अधिक मूर्तींचे दान झाले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात दोन लाख २४ हजार ९६८ मूर्तींचे दान झाले. सार्वजनिक मंडळेही मोठ्या गणेश मूर्ती दान करत आहेत. प्लास्टर व रासायनिक रंगामुळे पाणी प्रदूषित होत असल्याने शाडूची मूर्ती व नैसर्गिक रंगाचा वापर केलेल्या मूर्तीची पूजा करण्याकडे कल वाढला आहे. घरीच मूर्ती विसर्जन करण्याची पद्धतही भाविकांकडून अंगिकारली जात आहे.
महापालिकेने सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पंचगंगा नदीवर रक्षाकुंड उभारले आहेत. नागरिकांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. चिमूटभर रक्षा नदीत विसर्जित करून शिल्लक रक्षा कुंडात टाकण्यात येते. ग्रामीण भागातही शेतातच रक्षा विसर्जन करण्याची चळवळही यशस्वी होऊ लागली आहे. प्रबोधन, जनजागृतीतून धार्मिक विधीतून प्रदूषण कमी होण्यास बऱ्याचअंशी मदत झाली आहे, पण शंभर टक्के पाणी प्रदूषण रोखण्यासाठी धार्मिक क्षेत्रातील तज्ज्ञमंडळी, विज्ञान चळवळीतील कार्यकर्ते आणि प्रशासनामध्ये समन्वय राहिला तर पाणी प्रदूषण कमी होण्यास मदत होऊ शकते.
०००००००००००००