अ‍ॅपशहर

भाड्याच्या घरात रुजतेय डॉक्टरकीचे स्वप्न

घरी ना कुणी शिकलेलं ना कुणाचा भरभक्कम आर्थिक आधार. अशा प्रतिकूल स्थितीत मंगळवार पेठेतील संजीवनी संजय आपटे ही विद्यार्थिनी जिद्दीने शिकते आणि दहावीच्या परीक्षेत ९३.६० टक्के गुण मिळवते.

Maharashtra Times 16 Jul 2018, 4:14 pm
Appasaheb.mali@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dream of a doctor in a rented house
भाड्याच्या घरात रुजतेय डॉक्टरकीचे स्वप्न


Tweet:@Appasaheb_MT

कोल्हापूर :

घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. कुटुंबांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी धुणीभांडी करणारी आई. दहा बाय बारा फुटाच्या भाड्याच्या खोलीत थाटलेला संसार. घरी ना कुणी शिकलेलं ना कुणाचा भरभक्कम आर्थिक आधार. अशा प्रतिकूल स्थितीत मंगळवार पेठेतील संजीवनी संजय आपटे ही विद्यार्थिनी जिद्दीने शिकते आणि दहावीच्या परीक्षेत ९३.६० टक्के गुण मिळवते. आता संजीवनीला एमबीबीएस करुन डॉक्टर व्हायचं आहे. ध्येय साध्य करण्यासाठी कष्टाची, अहोरात्र अभ्यास करण्याची तिची तयारी आहे. तिच्या या स्वप्नपूर्तीसाठी समाजाचा आर्थिक हातभार लागल्यास तिचे भविष्य उजळणार आहे.

संजीवनी येथील प्रिन्सेस इंदुमतीदेवी गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी. पहिलीपासूनच हुशार म्हणून तिची ओळख. घरी अठराविश्व दारिद्र्य असतानाही शाळा आणि अभ्यासात खंड पडला नाही. मंगळवार पेठेच्या पाटाकडील तालमीसमोर भाड्याच्या खोलीत ती आईवडील आणि लहान बहिणीसह राहते. वडील रोजंदारी करतात. तर आई शीतल या धुणीभांडी करतात. कुटुंबांचा सगळा भार आईवर. नववीपर्यंत शिकलेल्या शीतल यांनी दोन्ही मुलींच्या शिक्षणावर लक्ष दिले. प्रसंगी पोटाला चिमटा काढला. पण, मुलींच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. रोज दुपारपर्यंत इतरांच्या घरी धुणीभांडी करायची आणि दुपारनंतर गजरा माळण्याचे काम करत पै-पै साठवला.

आईच्या कष्टाची संजीवनीला पुरेपूर जाणीव आहे. आपण शिकलो, उच्च शिक्षित झालो आणि करिअर घडलं तरच कुटुंबांचे भविष्य उजळेल, हा विचार तिला प्रत्येकवेळी नवे बळ देऊन जातो. तिने प्रतिकूल परिस्थितीचा कसलाही बाऊ न करता शिकायचं ठरविलं. नुसतं शिकायचं नाही तर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं, अशी खूणगाठ मनाशी बांधली आणि वर्षभराच्या अभ्यासाचे योग्य नियोजन केले. पहाटे लवकर उठायचं, अभ्यास करायचा. दिवसभर शाळा. संध्याकाळी पुन्हा वाचन-लेखन असा जणू नित्यक्रम बनला. कधी स्वयंपाक खोलीत अभ्यास, तर कधी आजीच्या रुममध्ये. वर्षभरात अभ्यासात कधी खंड पडला नाही.

दहावीपर्यंत शिक्षण घेतले, चांगले गुण मिळवले. आता पुढील शिक्षण कसे पूर्ण करायचे? शिक्षणाच्या खर्चाचा भार कोण उचलणार? या विवंचनेत आता अख्खं कुटुंब आहे. प्रतिकूल परिस्थितीत दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन संजीवनीने तिच्यातील जिद्दीचे दर्शन घडविले आहे. आता एमबीबीएस करायचे आहे. दानशूरांची साथ मिळाल्यास तिच्या स्वप्नांना पंख मिळणार आहेत.

......२

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज