म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
गूळ खरेदीदाराकडे असलेल्या माथाडी कामगारांना हमाली वाढविण्यास नकार दिल्याने त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. गूळ व्यापारी आणि माथाडींमधील वाद मिटवण्यासाठी आमदार विनय कोरे यांनी मध्यस्थी केली असून, त्यावर सोमवारी (ता.१८) तोडगा निघण्याची शक्यता आहे. गेले तीन दिवस सुरू असलेल्या आंदोलनामुळे गूळ उत्पादकांचे नुकसान होत आहे.
मार्केट यार्ड येथील शेती उत्पन्न बाजार समितीतील गूळ खरेदीदार व्यापाऱ्यांकडे साडेतीनशेहून अधिक हमाल आहेत. शेतकऱ्यांकडून गूळ खरेदी केल्यानंतर गूळ वाहतूक, शिलाई, शिक्के मारण्याचे काम केले जाते. गूळ व्यापारी आणि माथाडी यांच्यात २०१५ मध्ये हमालीवाढीसंदर्भात करार झाला असून, दर चार वर्षांनी दहा टक्के हमाली वाढविण्याचे ठरले होते. करारानुसार चार वर्षे पूर्ण झाले असून, माथाडींनी हमाली वाढवून देण्याची मागणी केली. त्याला गूळ व्यापाऱ्यांनी नकार दर्शविल्यावर काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे गूळ सौद्यावर थोडा परिणाम झाला आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सभापती बाबासाहेब लाड यांच्यासह व्यापारी प्रतिनिधींनी प्रयत्न केले. सभापतींच्या आश्वासनानंतर माथाडींनी काम बंद आंदोलन मागे घेतले, पण हमाली वाढवण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिल्याने हा वाद चिघळला आहे. हा वाद अखेर आमदार विनय कोरे यांच्याकडे गेला आहे. आमदार कोरे यांनी माथाडींचे प्रतिनिधी, व्यापाऱ्यांची चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. हमाली वाढीसंदर्भात सोमवारी व्यापारी पत्र देणार असून त्यानंतर काम सुरू होण्याची शक्यता आहे.