सत्यता पडताळून, विचार करुनच पोस्ट व्हायरल, शेअर करा : पाचलग
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'समाजकंटक आपला हेतू साध्य करण्यासाठी सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात वापर करतात. फेक न्यूज अफवा पसरविण्याचे सूत्र बनले आहे. समाजमाध्यमांवरील माहिती, छायाचित्र आणि व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी विचार, निरीक्षण, सत्यता आणि त्याचा परिणामांचा गांभीर्याने विचार केल्यासस फेक न्यूज रोखता येऊ शकेल', असे प्रतिपादन सोशल मीडिया तज्ज्ञ विनायक पाचलग यांनी दिला. जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हास्तरीय सायबर सेल आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 'फेक न्यूज परिणाम आणि दक्षता' या विषयावर प्रसार माध्यमांसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
पाचलग म्हणाले, ' देशांत इंटरनेट वापराचे प्रमाण २७ टक्के असून २२ कोटी लोक फेसबुक आणि १७ कोटी जण व्हॉट्अपचा वापर करतात. समाजकंटक या सोशल मीडियाचा गैरफायदा घेतात. त्याला काही सर्वसामान्य नागरिकच बळी पडतात. कोणत्याही गोष्टीची सत्यता पडताळून घेतली जात नसल्याने संभ्रमावस्था वाढते. सोशल मीडियाचा वापर करताना 'थिंक व्टॉईस' हा मंत्र उपयोगी ठरु शकतो. मेसेज फॉरवर्ड करताना क्षणभर थांबून, विचार करुनच शेअर केला पाहिजे. फेकन्यूजच्या वाढत चाललेल्या थैमानाला आळा घाल्यासाठी प्रत्येकानेच विचारपूर्वक पोस्ट व्हायरल केली पाहिजे. खरी आणि खोटी फेक न्यूज ओळखता आली पाहिजे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोस्टची खात्री करुन घेण्यासाठी डॉक्टर, वकील, सी.ए. आदींचा ग्रुप तयार करावा. समाजमाध्यमांवरील येणाऱ्या पोस्टची त्या-त्या क्षेत्रातील मान्यवरांकडून सत्यता पडताळल्यास फेकन्यूजला रोखणे शक्य होईल. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत, पोलिस उपअधिक्षक सतीश माने आदी उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी, एस. आर. माने यांनी स्वागत केले.