म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असताना पॅरोलवर मिळालेल्या सुट्टीदरम्यान पळून गेलेल्या पाच कैद्यांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २०) गुन्हा दाखल करण्यात आला. सवलतीची सुट्टी संपताच कैद्यांनी पुन्हा कारागृहात हजर होणे बंधनकारक होते. मात्र अटींचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
गौतमलाल भुवानजी मीना (वय ३६, रा. केरवास, जि. प्रतापगढ, राजस्थान) याला २२ मार्च २०१३ रोजी एक महिन्याची सुट्टी मंजूर झाली होती, पण तो अद्याप दाखल झालेला नाही. चैनसिंह पैपसिंह राठोड (वय ३९, रा. सिकारपूर, जि. जोधपूर, राजस्थान) २२ ऑक्टोबर २०१० पासून कारागृहाबाहेर आहे. बलवीरसिंग इंद्रसिंग महाल (वय ५०, रा. दिनापूर, पंजाब) ६ मे २०१२ पासून एक महिन्याच्या सुट्टीसाठी गेला. मात्र तो परत आलेला नाही. मानजितसिंग जोगिंदरसिंग सैनी (वय ३५, रा. होशियारपूर, पंजाब) १४ मार्च २००८ पासून कारागृहाबाहेर आहे. तसेच रवींद्र मिश्री चौहाण (वय ३४, रा. हुसेनगंज, बिहार) २७ ऑगस्ट २०१६ पासून सुट्टीसाठी गेला. तो अद्याप परत आलेला नाही. या सर्वांविरोधात कारागृहातील अधिकारी उत्तम मारुती पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.