म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी
'एकमेकांची जिरवण्याच्या नादात सर्वांचीच जिरल्यामुळे पक्ष अडचणीत आला. पण आता पक्षाला पुन्हा भक्कम करण्यासाठी सर्वजण झालं गेलं विसरुन एकत्र आलो आहोत. वरिष्ठ पातळीवर आघाडीसंदर्भात काहीही निर्णय होवो. पण, पी. एन. पाटील, सतेज पाटील, राजूबाबा आवळे, गणपतराव पाटील व मी स्वत: अशा पाच जागा काँग्रेसच्याच असणार आहेत' असा विश्वास माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. आमच्या आघाडीसोबत राजू शेट्टी येणार असतील त्यांनाही विजयी करु अशी ग्वाही दिली. इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवनात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पा आवाडे होते.
बैठकीत माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी, 'कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. परंतु अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची वाताहात झाली. गटबाजीची ही कीड मूळापासून नष्ट करण्याची गरज आहे. त्यासाठी अंतर्गत वितुष्ट संपवून आम्ही सर्वजण एकजुट झालो आहोत. निवडणुकीत इचलकरंजीचे दोन आमदार झाले पाहिजेत. प्रकाश आवाडे यांनी राजूबाबा आवळे यांना आमदार करण्याचा शब्द दिला आहे. आमची ताकद कमी असली तरी प्रामाणिकपणे मदत करून आवाडेंना आमदार करू. आता गटबाजीचे राजकारण संपले आहे. प्रकाश आवाडे यांना जिल्हाध्यक्ष करण्यासाठी मी आणि आमदार सतेज पाटील प्रयत्नशील असून ते निश्चितपणे अध्यक्ष होतील' असे सांगितले.
याचाच धागा पकडून आवाडे यांनी 'आगामी निवडणुकीत हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून राजूबाबा आवळे यांना १३ गावांतील निर्णायक मतावर निश्चितपणे आमदार करू' असे सांगितले. 'इथे राजूबाबा अनेक आहेत. पण, आपल्याला राजू जयवंतराव आवळे यांना आमदार करायचे आहे,' असे आवाडे यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
'भाजप सरकारने केवळ घोषणाबाजी करत सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणार्या भाजपाला जनता जागा दाखवून देईल. सुज्ञ जनता राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसला निश्चितपणे बळ देईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनीही जोमाने कामाला लागावे' असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव तथा पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारी सोनल पटेल यांनी केले. यावेळी हरिष रोगे, यशवंत हाप्पे, अलका राठोड, प्रदेश काँग्रेस सचिव प्रकाशराव सातपुते, राजीव साहू, चैतन्य रेड्डील, नासिर झकेरीया, विलास गाताडे, अशोकराव सौंदत्तीकर, राहुल आवाडे, राजू आवळे, संजय केंगार, अमरजित जाधव, राजू बोंद्रे, बिलकिस मुजावर, ध्रुवती दळवाई, लक्ष्मी पोवार, तेजश्री भोसले, रुपाली कोकणे, बाळासाहेब कलागते, पै. अमृत भोसले, अनिस म्हालदार, बाबासाहेब चौगुले, सूरज बेडगे, पवन शिंदे, किशोरी आवाडे, अंजली बावणे, रत्नप्रभा भागवत, हमिदा गोरवाडे, जुगनू पिरजादा, लक्ष्मी सपाटे आदी उपस्थित होते.
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे यांनी स्वागत केले. राहुल खंजिरे यांनी आभार मानले.