फोटो
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दहा मतदारसंघासाठी आज, शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात उमेदवारासह पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. शंभर मीटर परिसरात तीन वाहने आणि पाच व्यक्तींनाच प्रवेश असेल. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखलची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात होत आहे. सर्वच राजकीय पक्षांमधील घडामोडींना वेग आला आहे.
२१ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ४ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या एक दिवसआधी निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते काढणे बंधनकारक आहे. अशा स्वतंत्र बँक खात्याचा तपशील नामनिर्देशनपत्र दाखल करताना सादर करावयाचा आहे. ज्या उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्याच्यावरील दाखल, प्रलंबित किंवा सिध्द असलेल्या फौजदारी गुन्ह्याचा समावेश केलेला आहे, त्यांनी याबाबतची विहित नमुन्यातील माहिती जास्तीजास्त खपाच्या स्थानिक वृत्तपत्रात तसेच दूरदर्शन वाहिन्यांवर मतदानाच्या दिवसापासून दोन दिवसआधी किमान तीन वेळा स्वत: हून सर्वांच्या माहितीसाठी स्वखर्चाने प्रसिध्द करावयाची आहे. उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशनपत्र व प्रतिज्ञापत्र दररोज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नोटीस बोर्डावर आणि निवडणूक आयोगाच्या संकेस्थळावरही प्रसिध्द करण्यात येणार आहे. २१ ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासन जागृती करीत आहे.
...