म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
पेट्रोल-डिझेलची दरवाढ तातडीने रोखा तसेच थर्ड पार्टी विमा हप्त्यात केलेली वाढ कमी करून कोल्हापूर-मुंबई मार्गावर ट्रक टर्मिनलची उभारणी करण्याची मागणी सोमवारी मालवाहतूकादारांनी केली. या मागण्यांसाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीसह मोर्चा काढण्यात आला. प्रचंड घोषणाबाजी करत मालवाहतूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय व मोर्चाचा मार्ग दणाणून सोडला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.
सकाळी ११ वाजता ताराराणी चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. एसटी स्टँड, दाभोळकर कॉर्नर, गोकुळ हॉटेल, बसंत-बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला. लॉरी असोसिएशनचे मालवाहतूकदार लक्षवेधी फलक घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. 'पेट्रोल-डिझेल दर कमी करा', 'थर्ड पार्टी विमा हप्ता कमी करा,' आदी घोषणा देत मोर्चाचा मार्ग दणाणून सोडण्यात आला. मोर्चातील बैलगाडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अडवण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुभेदार यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, भाऊ घोगळे, हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, विजय भोसले यांचा समावेश होता.
निवेदनात म्हटले आहे, 'क्रुड तेलाचे भाव कमी झालेले असताना सरकारने अतिरिक्त कर लावून पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. केंद्र सरकारने अतिरिक्त कर लावलेला असताना राज्य सरकारने दुष्काळ कर लावून मालवाहतूकदारांवर जास्तीचा बोजा टाकला आहे. त्याचबरोबर इंधनावर शिक्षण व कृषी कराची आकारणी केली जात असल्याने इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल लिटरला सहा ते नऊ तर डिझेल तीन ते पाच रुपये जादा द्यावे लागत आहेत. यातून मालवाहतूकदारांची सुटका करण्यासाठी इंधनाचा समावेश जीएसटीमध्ये करावा, यामुळे इंधन दर स्वस्त होऊन वाहनधारकांना दिलासा मिळेल. थर्ड पार्टी हप्त्यात २६ टक्के वाढ केल्यामुळे जुन्या वाहनधारकांना वाहनांच्या किमतीएवढा विमा हप्ता भरावा लागत आहे. टोल टॅक्समध्ये १८ टक्के वाढ केली आहे. रस्ते बांधणीनंतर सर्व रक्कम वसूल झालेली असताना टोल बंद करण्याऐवजी त्यात वाढ केल्यामुळे वाहनधारकांना वाहतूक व्यवसाय करणे जिकिरीचे बनले आहे. कोल्हापूर ते मुंबई सहापदरी रस्ता करण्यात येत आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड नसल्याने वाहतूकदारांना विश्रांतीसाठी जागाच मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक ७० किमी अंतरावर ट्रक टर्मिनल उभारावे.
मोर्चात शिवाजी चौगुले, जगदीश सोमेय्या, विलास पाटील, पंडित कोरगांवकर, विजय पोवार, शशांक जाधव, गोविंद पाटील, उमेश महाडिक, प्रकाश भोसले, बबन महाजन यांच्यासह जिल्ह्यातील बॉक्साईट, वाळू, ऊस वाहतूकदार सहभागी झाले होते.
................
मालवाहतूकदारांच्या मागण्या
सरकारी अंतरानुसार किलो मीटरप्रमाणे वाहतूक भाडे द्यावे
पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करावी
वाढीव थर्ड पार्टी विमा कमी करा
वाढीव टोल टॅक्स कमी करा
कोल्हापूर-मुंबई मार्गावर ट्रक टर्मिनलची निर्माण करा
००००००००००००