म. टा. वृत्तसेवा, शिराळा
हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यात हृदयविकाराने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पुण्यातील जोशी रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अभिजित, दोन भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी पुनवत (ता. शिराळा) या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत. आंदळकर यांच्या निधनामुळे देशभरातील कुस्तीक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
आंदळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील पुनवत (ता.शिराळा) येथे १९३५ साली शेतकरी कुटुंबात झाला. १९५० साली ते गावातून कुस्ती शिकण्यासाठी कोल्हापुरात आले. मोतीबाग तालमीत बाबासाहेब वीर यांच्याकडे कुस्तीची तालीम सुरू केली. जन्मजात मिळालेल्या बळकट शरीरयष्ठीवर मेहनत घेऊन त्यांनी कुस्तीचा सराव केला. जयपराजयाची फिकीर न करता शेकडो कुस्त्या त्यांनी केल्या. पूर्ण कारकिर्दीत २०० हून अधिक कुस्त्या केल्या. त्यांनी ४० हून अधिक कुस्त्यांमध्ये पाकिस्तानमधील मल्लांना धूळ चारली. कुस्तीविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे आंदळकर हे प्रशिक्षक म्हणून जेवढे कडक, कठोर होते, तेवढेच ते विनम्र स्वभावाचे होते. कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टचा शाहू पुरस्कार जाहीर झाला तेव्हा अर्जुन पुरस्कारापेक्षा अधिक आनंद झाल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते . १९६४ साली भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते. आंदळकरांच्या उमेदीचा काळ कुस्तीचे सुवर्णयुग होते. कुस्तीला प्रतिष्ठा होती आणि मल्लांना ग्लॅमर होते. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले होते, ते कोल्हापुरात सराव करूनच.
आंदळकर यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय देदीप्यमान कामगिरी बजावली. त्यांनी १९६० मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली. पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसीर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, लीलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनीफ, श्रीरंग जाधव या नामवंत मल्लांबरोबरच्या त्यांच्या लढती गाजल्या होत्या. १९६२ मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियाई स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक, तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले. १९६४ मध्ये टोकिओ ऑलिम्पिकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व आंदळकर यांनी केले. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल १९८२ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरविले आहे. कोणत्याही मल्लाची कारकीर्द खूप कमी असते. उमेदीच्या अल्पशा कालावधीत विजेसारखे चमकून दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहावे लागते. कुस्ती सोडल्यानंतर बहुतेक मल्ल आपल्या पारंपरिक व्यवसायात गुंतून जातात.
गणपतराव आंदळकर यांनी मात्र लाल मातीची संगत सोडली नाही. १९६७ पासून मोतीबाग तालमीत कुस्ती प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी अनेक मल्ल घडविले. पैलवान मेहनतीवर घडतो आणि मेहनतीचा दर्जा खुराकावर अवलंबून असतो हे पैलवानकीचे मूळ शास्त्र आंदळकर नेहमी सांगत होते.
००००००००