अ‍ॅपशहर

Hasan Mushrif: डॉक्टरांनी नेमकं केलं काय?; 'त्या' करोनामृत्यूंचं होणार ऑडिट

Hasan Mushrif ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील करोना मृत्यूंबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली असून त्यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या डॉक्टरांनाही इशारा दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Oct 2020, 11:16 pm
कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे आजपर्यंत झालेल्या सर्व करोना बाधित मृत्यूंचे ऑडिट करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम हसन मुश्रीफ


वाचा: राज्याने ओलांडला १५ लाखांचा टप्पा; करोनामुक्तांचा टक्काही वाढतोय

मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, करोनामुळे या तीन जिल्ह्यांत गेल्या सहा महिन्यात चार हजारांवर रुग्णांचे बळी गेले. हा आकडा मोठा असल्याने त्याचे ऑडिट करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. याला मान्यता मिळाल्याने तातडीने याचे ऑडिट सुरू करण्यात येईल. रुग्णांना दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी काय उपचार केले? डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला का? रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी पडल्याने मृत्यू झाला की आरोग्य यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे याचा शोध घेतला जाणार आहे. काही डॉक्टरांनी या काळात रुग्णांची लूट केल्याच्या तक्रारी आहेत. माणुसकी सोडून केलेल्या लुटीचा डॉक्टरांना हिशेब द्यावा लागेल, असेही मुश्रीफ यांनी बजावले.

वाचा: मुंबई लोकलबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला महत्त्वाची सूचना

राज्यात करोना बाधितांची संख्या सध्या कमी होत असली तरी, येत्या काही दिवसांत पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. नवरात्रोत्सव , दिवाळी, दसरा यामुळे लोकांची गर्दी वाढेल. हॉटेल, लोकल रेल्वे सुरू होणार असल्याने करोनावाढीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना सरकारने प्रशासनाला दिल्याचे सांगून मंत्री मुश्रीफ म्हणाले, रुग्णांना औषधे कमी पडू नयेत, याचीही व्यवस्था केली आहे.

वाचा: सांस्कृतिक कार्यक्रमांना लवरकच परवानगी मिळणार ; सांस्कृतिक कार्य राज्यमंत्र्यांची ग्वाही

येत्या १५ ऑक्टोबरपासून साखर हंगाम सुरू करण्यास परवाने दिल्याचे स्पष्ट करून मुश्रीफ म्हणाले, १० ते १७ ऑक्टोबर दरम्यान परतीच्या पावसाचा अंदाज आहे. यामुळे गळीत हंगाम थोडा पुढे जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत साखर कारखान्यांवर आलेल्या ऊस तोडणी मजुरांना करोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारने योग्य दक्षता घेतली आहे.

वाचा: करोनाची उत्पत्ती: WHOकडून चौकशी समिती ठरली; अंतिम निर्णय चीन घेणार!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज