म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
विविध मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सदस्य व त्यांच्या नातेवाईकांनी विधानसभा निवडणूक लढविली आहे. मंत्रालय गाठण्यासाठी कोणी जि.प.सदस्यपदाचा राजीनामा दिला, तर कोणी पक्ष व आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे जिल्हा परिषद सदस्यांचे लक्ष लागले आहे.
शिरोळ तालुक्यातील सदस्य दलितमित्र अशोक माने यांनी जनसुराज्यच्या चिन्हावर हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व जि.प.सदस्यपदाचाही राजीनामा दिला आहे. भुदरगड तालुक्यातील राष्ट्रवादीचे सदस्य जीवन पाटील यांनी बंडखोरी केली आहे. ते वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर राधानगरी मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत.
माजी सदस्य राहुल देसाई यांनी निवडणूक लढवायची म्हणून भाजपात प्रवेश केला. मात्र युती झाल्यामुळे त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. जिल्हा परिषद सदस्या सुनिता रेडेकर यांचे पती रमेश हे चंदगड मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव यांनी अपक्ष म्हणून राधानगरीतून निवडणूक लढविली आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व आमदार अमल महाडिक यांनी जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्व केले आहे. याशिवाय बांधकाम समितीचे माजी सभापती संग्राम कुपेकर, सावकार मादनाईक यांनी अनुक्रमे चंदगड व शिरोळमधून निवडणूक लढविली आहे. त्यांच्या निकालाविषयी उत्सुकता आहे.