अ‍ॅपशहर

टार्गेटपुरत्याच होतात कारवाया

राज्य सरकारने गुटखा निर्मितीसह विक्रीवरही बंदी घालून पाच वर्षे उलटली. मात्र गुटख्याची किंमत आणि अधिकाऱ्यांचे हफ्ते वाढण्याखेरीज काहीच फरक पडला नाही.

Maharashtra Times 17 Feb 2017, 3:00 am
Uddhav.Godase@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gutka and mataka in kolhapur
टार्गेटपुरत्याच होतात कारवाया

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : राज्य सरकारने गुटखा निर्मितीसह विक्रीवरही बंदी घालून पाच वर्षे उलटली. मात्र गुटख्याची किंमत आणि अधिकाऱ्यांचे हफ्ते वाढण्याखेरीज काहीच फरक पडला नाही. राज्यात उघडपणे सुरू असलेले गुटखा निर्मितीचे कारखाने आता छुप्या पद्धतीने सुरू आहेत. तशीच विक्रीही छुप्या पद्धतीने सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून टार्गेटपुरत्या कारवाया होतात. त्यानंतर तेरीभी चूप और मेरीभी चूप अशीच गत होते.

गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थांमुळे कॅन्सरचा धोका उद्भवतो. कॅन्सरने ओढवणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही धक्कादायक आहे. काही राज्यकर्तेही कॅन्सरच्या विळख्यात सापडल्याचे उघड झाले. त्यानंतर २०१२ मध्ये राज्यात गुटखा निर्मिती आणि विक्री करण्यास तत्कालीन आघाडी सरकारने बंदी घातली. बंदीचा निर्णय जितक्या धडाडीने घेतला, तितकी त्याची अंमलबजावणी झाली नाही. केवळ राज्यातील उघड निर्मिती बंद झाली, एवढाच काय तो बदल झाला.

आजही कोल्हापूर जिल्ह्याच्या गावागावात, रस्त्यारस्त्यांवर गुटख्याच्या रिकाम्या पुड्या पडलेल्या दिसतात. पान टपऱ्या आणि दुकानांतून गुटख्याची छुप्या पद्धतीने विक्री कधीच बंद नाही. विक्रेत्यांना दुकानांमध्ये गुटख्याची पॅकेट्स पोहोच करणारी यंत्रणा कार्यरत आहे. विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांना या पुड्या अपवादानेच आढळतात. केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवायांचे उद्दिष्ट दिले आहे, म्हणूनच कारवाया केल्या जातात. महिन्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले की मग मात्र यंत्रणेला गुटखा विक्री दिसतच नाही. या सोयीस्कर भूमिकेबद्दल नेहमीच आश्चर्य व्यक्त केले जाते.

जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू आहे. किराणामालाची छोटी दुकाने, पानटपऱ्या आणि शाळांच्या बाहेर रस्त्याकडेला बसून खाऊ विकणाऱ्यांकडेही गुटख्याच्या पुड्या मिळतात. विशेष म्हणजे नवख्या माणसांना गुटखा मिळत नाही. नेहमीचे ग्राहक गेल्यानंतर त्यांना काही सांगण्याची गरजही पडत नाही. कागदात गुंडाळलेल्या पुड्या हातात ठेवल्या जातात.

दोन रुपयांच्या पुडीची किंमत पाच ते पन्नास रुपयांपर्यंत मोजावी लागते. पुडीची किंमत वाढली तरीही शोधून विकत घेणारेही कमी नाहीत. त्यामुळेच विक्रेतेही दररोज त्याच्या मनात येईल त्या दराने गुटखा विक्री करतात. कायद्यातून पळवाट म्हणून तंबाखूची वेगळी पुडी आणि सुपारीची वेगळी पुडी विकीली जाते. दोन्ही पुड्या मिक्स केल्यानंतर गुटखा तयार होतो. ही पळवाट बहुतांश विक्रेत्यांकडून अवलंबली जाते.

पर्याय माव्याचाही

गुटख्याला पर्याय म्हणून माव्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. शहरात खरी कॉर्नर, पद्मा चौक, मिरजकर तिकटी, लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नर, कोळेकर तिकटी, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, ताराबाई पार्क आदी परिसरात केवळ मावा खाण्यासाठी तरुणाईची गर्दी असते. गुटखा नसेल तर माव्याची पुडी घेतली जाते. मावा विक्रीवर बंदी नसल्याने शहरात माव्याची उलाढाल लाखो रुपयांची आहे.

कारवायांनी वाढतात हफ्ते

अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनाही विक्रेते माहितीचे आहेत. किंबहुना काही पोलिस कर्मचारीही गुटख्याचे नियमित ग्राहक आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या परिसरातही गुटख्याच्या पुड्या आणि रंगलेल्या भिंती दिसतात. विक्रेते आणि वितरकांवर कारवाई केल्यानंतर गुटख्याची उपलब्धता थांबत नाही, उलट हफ्त्यात वाढ होते, अशी चर्चा आहे. हप्तेखोरीमुळेच गुटखा विक्री सुरू राहते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज