हेरलेत भिंत पडून
महिला ठार, तिघे गंभीर
म. टा. वृतसेवा, हातकणंगले
हेरले (ता. हातकणंगले) येथील माळभागावरील हनुमान नगरमध्ये मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून एका महिला ठार झाली. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. अनिता रविंद्र काटकर (वय ३७) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून तर पती रवींद्र बापू काटकर (वय ४६), मुलगा अनिकेत (२०), मुलगी शिवानी (१७) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अचानक काळाने घातलेल्या झडपेने कुटूंब उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेरलेतील माळभागात हनुमाननगरातील सुतार गल्लीत रवींद्र काटकर हे रिक्षाचालक राहतात. त्यांचे दोन खोल्यांचे घर आहे. ते पत्नी अनिता, मुलगा अनिकेत, मुलगी शिवानी यांच्यासह राहतात. आठवडाभरापासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. रविवारी काटकर कुंटूबीय झोपले असता पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पावसामुळे घराच्या दोन्ही खोल्यांच्या भिंती खचल्या. या भिंती त्यांच्या अंगावर कोसळल्या. दगड-विटा मोठ्या प्रमाणात अंगावर पडल्याने चौघांनाही जोराचा मार बसला. अनिता यांच्या डोक्यास व पोटास मार बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. रवींद्र व त्यांच्या दोन्ही मुलांना पायांला हाताला दुखापत होऊन गंभीर जखमी झाले. भिंत कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने शेजारील अमिर पेंढारी, गुंडू परमाज, रफिक पेंढारी, पोपट सुतार यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. ढिगाऱ्यातून चौघांना बाहेर काढून तत्काळ खाजगी वाहनातून उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलला पाठविण्यात आले. अनिता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रवींद्र काटकर हे रिक्षाचालक आहेत. त्यांचा मुलगा अनिकेत हा दुचाकी दुरुस्तीचे काम शिकत आहे. तर मुलगी शिवानी ही उच्च माध्यमिक शिक्षण घेत आहे. अनिता या लक्ष्मी इंडस्ट्रीजमधील समर्थ फाउंड्रीत नोकरी करत संसारास हातभार लावत होत्या. मात्र रविवारी पहाटे त्यांच्यावर काळाने झडप घातली.