म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे
'राज्य शासनाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रामाणिक कर्जफेड करणारे शेतकरी आम्हाला न्याय कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत. पण काळजी करू नका प्रत्येक प्रामाणिक शेतकऱ्याला सरकार न्याय देणार' असा विश्वास गृह राज्यमंत्री व पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. कांडगाव (ता. करवीर) येथे जिल्हा परिषद शाळेच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री सतेज पाटील व संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाळेच्या डिजिटल वर्गांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्री पाटील यांनी गावातील विकासकामांसाठी दहा लाख रुपयांचा निधी देत असल्याचे जाहीर केले. शाळेच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
संयोगिताराजे छत्रपती म्हणाल्या, 'राजर्षी शाहूंच्या शंभर वर्षांपूर्वीच्या दूरदृष्टीची प्रचिती आज शाळेकडे पाहिल्यावर येते. शाहूंचे विचार जोपासत ग्रामस्थांनी शाळेची शतकमहोत्सवाकडे वाटचाल केली. शाहूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज छत्रपतींचे वारसदार म्हणून येताना खूप समाधान वाटत आहे.'
उद्योजक दिगंबर मेडसिंगे यांनी प्रस्ताविक केले. मारुतराव मेडसिंगे, सरपंच रुपाली मेडसिंगे, सभापती आश्विनी धोत्रे, राजेंद्र सूर्यवंशी, प्रताप पाटील, सुरेश कोळी, प्राचार्य सर्जेराव शिंदे, इंद्रजित आमते, अनिल भंडारे, सखाराम चव्हाण यांच्यासह माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
जगायला शिका...
'आयुष्य जगताना संकटे ही येतच असतात. आयुष्याचे चौकोन, त्रिकोण कळले पाहिजेत. शिक्षण हे आयुष्याचे कांगोरे कसे आहेत हे सांगणारं एक शास्त्र आहे. कितीही संकटे आली तरी हार मानू नका. संकटावर पाय ठेवून उभे रहा आणि जगायला शिका' असा सल्ला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी दिला.
फोटो :
कांडगाव (ता. करवीर) येथे प्राथमिक शाळेच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील, संयोगिताराजे छत्रपती, समाजसेविका सिंधूताई सपकाळ, दिगंबर मेडसिंगे, मारुतराव मेडसिंगे, रुपाली मेडसिंगे व इतर.