इचलकरंजी सोमवारी बंद
फोटो वारणेच्या पाण्यासाठी सोमवारी इचलकरंजी बंद प्रांताधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा मटा...
फोटो
....................
वारणेच्या पाण्यासाठी सोमवारी इचलकरंजी बंद
प्रांताधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा
म.टा. वृत्तसेवा , इचलकरंजी -
वारणा योजनेतील हक्काचे पाणी पदरात पाडून घेण्यासाठी आता सामंजस्याची नव्हे तर आरपारची लढाई लढावी लागणार आहे. एकजुटीने रस्त्यावरच्या आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. योजनेला विरोध करणाऱ्यांना इचलकरंजीकरांची ताकद दाखवण्यासाठी सोमवारी ( ता.१४) इचलकरंजी कडकडीत बंद ठेवून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय सभेत ही घोषणा करण्यात आली.
राज्य सरकारने मंजूर केलेल्या वारणा नळ पाणी योजनेला दानोळी ग्रामस्थांसह वारणाकाठच्या ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी मंगलधाम येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यामध्ये शहरातील सर्व राजकीय पक्ष, आजी , माजी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सामाजिक संघटना आदी सहभागी झाले होते.
सर्वपक्षीय कृती समितीच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा स्वामी म्हणाल्या, 'इचलकरंजी शहरासाठी वारणा योजना सरकारने मंजूर केली आहे. याला दानोळीकरांनी विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. आजपर्यंत प्रशासनाने सामंजस्याचा मार्ग स्वीकारून बैठकीच्या माध्यमातून योजना पूर्ण होण्यासाठी प्रयत्न पणाला लावले. मात्र दानोळीकरांचा विरोध आजही कायम आहे. प्रशासनाने अखेरचा पर्याय म्हणून बळाचा वापर करून योजनेचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्येही यश आले नाही. आता इचलकरंजीकरांना ही योजना पूर्ण करण्यासाठी लोकचळवळीतून आंदोलनाची गरज निर्माण झाली आहे. हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. यासाठी सोमवारच्या बंदमध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हावे.'
वारणा योजनेला विरोध करणाऱ्या दानोळीतील मूठभर पुढाऱ्यांच्या टोळीचा योग्य बंदोबस्त केला जाईल असे सांगून आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, 'जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या पुढाऱ्यांकडून केला जात आहे. या घाणेरड्या राजकारणामुळे दानोळीकरांना ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. इचलकरंजीकर या तथाकथित पुढाऱ्यांचे प्रयत्न उधळून लावतील. मूठभर पुढाऱ्यांकडून दानोळी गावकऱ्यांना भडकवले जात आहे. केवळ आठ - दहा लोकांमुळे वारणा काठ वेठीस धरला जात आहे. कडकडीत बंद करून इचलकरंजीकरांची ताकद संपूर्ण राज्याला दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. पाण्यासाठी रक्कम उकळणाऱ्या टग्यांचा भविष्यात जनताच बंदोबस्त करेल. महाडच्या चवदार तळ्यातील पाण्यासाठी झालेल्या आंदोलनाप्रमाणे वारणेसाठी इचलकरंजीकर जनआंदोलन करतील. त्याचबरोबर सरकारस्तरावरूनही प्रयत्न सुरूच राहतील.'
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी वारणेच्या पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष योग्य नसल्याचे सांगितले. संघर्षामुळे कटूता निर्माण होऊन दुरावा वाढतो, म्हणून शांततेने हा प्रश्न सुटावा म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हाळवणकर यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेऊन त्यातून मार्ग काढावा असे सुचित केले.भविष्यात वारणा योजनेच्या पूर्णत्वाबरोबरच पंचगंगा प्रदुषणमुक्तीसाठीही पावले उचलणे गरजेचे आहे.
यावेळी शशांक बावचकर, मदन कारंडे, हिंदुराव शेळके, प्रकाश मोरे, विनय महाजन, मेघा चाळके, सुप्रिया गोंदकर , शामराव कुलकर्णी, विजय भोसले, धनाजी मोरे, बजरंग लोणारी, बाळासाहेब कलागते, भाऊसो आवळे, गुरूनाथ म्हातुकडे, संगिता आलासे, सदा मलाबादे आदींनी मनोगत व्यक्त केले.
..................
तोडपाणीचा प्रस्ताव
आमदार हाळवणकर म्हणाले,' वारणा बचाव कृती समितीच्या आठ -दहा पुढाऱ्यांनी आमच्यापुढे तोडपाणीचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र त्याला आम्ही दाद दिली नाही. रक्कम उकळणाऱ्या टग्यांच्या पाठीशी शिरोळ तालुक्यातील काही नेते आहेत, त्यांची भूमिका योग्य नाही. पुढाऱ्यांच्या टोळीने पोलिसांवर चटणी टाकून दगडफेक करण्याचा कुटील डाव आखला होता, याबाबत पोलिसांकडे गोपनीय माहीती आहे. सरकारने तीन महिन्यांचा पोलिस बंदोबस्त दिला आहे. त्यामुळे ही योजना कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच.'