म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महापुरामुळे नुकसान झालेल्यांचे पुनर्वसन आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी लोकसहभाग अधिक घ्यावा, शहरातील रेड आणि ब्लू लाइन त्वरित निश्चित करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) पुनर्प्राप्ती सल्लागार डॉ. कृष्ण वत्स यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बुधवारी प्रशासनास दिले. शहरातील पूरग्रस्त भागाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.
गेल्या महिन्यातील महापूर आणि अतिवृष्टीमुळे शहर आणि जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांचे पुनर्वसन करणे, भविष्यात पूर आल्यास नुकसान होऊ नये, यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी सरकारने जागतिक बँकेकडे ३२ हजार कोटींची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून वत्स यांच्या नेतृत्वाखालील गृहनिर्माण तज्ज्ञ पी. के. दास, उपजीविका तज्ज्ञ हेमंत वाळवेकर, अविनाश कुमार यांचे पथक जिल्हा दौऱ्यावर आले आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी पथकाने शाहूपुरीतील कुंभार गल्लीस भेट दिली. तेथील नुकसानग्रस्त गणेश मूर्तिकारांशी थेट संवाद साधला. शक्य असल्यास कायमस्वरूपी स्थलातंर व्हावे, शक्य नसल्यास पुराचे पाणी आले तरी नुकसान होऊ नये अशाप्रकारे घरांचे बांधकाम करावे, असे वत्स यांनी सुचवले. शिवाजी पूल आणि जयंती नाल्याच्या पाहणीवेळी त्यांनी पुराचे पाणी येऊ नये, यासाठी संरक्षक भिंत बांधू नये, त्याऐवजी नाला, नदीकाठावर वृक्षलागवड करावी, असे सांगितले. कोल्हापूर महापालिकेने शहर विकास आराखडा करताना उंच आणि सखल भाग कुठे आहेत, हे निश्चित करावेत, रेड आणि ब्लू लाइन निश्चितीसाठी पाठपुरावा करावा, पडझड झालेल्यांची घरे उभी करताना आणि त्यांचे आर्थिक स्रोत पूर्ववत करण्यासाठी लोकांचा सहभाग घ्यावा, अशाही सूचना केल्या. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते. त्यांनी नुकसानीची तीव्रता निदर्शनास आणून दिली.
गायकवाडवाडा, उत्तरेश्वर पेठ परिसरातील नुकसानीची पाहणी करून पथक इचलकरंजीला गेले. तेथे महापुराचे पाणी घुसलेल्या पॉवर लूमला भेट दिली. तेथून शिरोळ, नृसिंहवाडी येथील नुकसानीची पाहणी केली. नृसिंहवाडीतील दुकानदारांनी पूरनियंत्रणासाठी केंदीय पातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी पथकाकडे केली. कुरुंदवाड, टाकळी येथेही पथकाने भेट दिली. गुरुवारीही पथक जिल्ह्यात आहे. दुपारनंतर सांगलीला रवाना होणार आहे.
००००