म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
बालिंगा पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्याने सी आणि डी वार्डात शनिवारी दिवसभर अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा झाला. दिवसभरात २६ टँकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. सायंकाळी साडेसहा वाजता बिघाड काढण्यात यश आले असून बालिंगा उपसा केंद्रातून पूर्ण क्षमतेने उपसा सुरू झाला. दरम्यान शिंगणापूर जलवाहिनीला लागलेली गळती दूर काढण्यास सोमवारपासून सुरूवात होईल. त्यामुळे ए., बी. आणि ई. वॉर्डातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे.
बालिंगा उपसा केंद्रातील तीन विद्युत पंपांपैकी एक पंप बंद पडल्याने शुक्रवारपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता. शनिवारी दिवसभर पंपाची दुरुस्ती सुरू होती. दुपारी अडीच वाजता दुरुस्ती पूर्ण झाली. त्यानंतर सायंकाळी साडेसहानंतर तिन्ही विद्युतपंप सुरू झाले. मात्र सकाळी पाणी येणाऱ्या भागात अपुऱ्या दाबाने पाणी आल्याने नागरिकांना टँकरद्वारा पाणी देण्यात आले. कळंबा फिल्टर हाउस येथून १५ व कसबा बावडा फिल्टर हाउस येथून ११ अशा २६ टँकर फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.
आझाद चौक, राजकपूर पुतळा, आपटेनगर, सुभाष रोड, नागाळा पार्क, सिद्धार्थ नगर, रमण मळा, लक्ष्मीपूरी, कसबा बावडा (शाहू विद्यालय), राजारामपुरी, बिंदू चौक, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. रविवार सकाळपासून सी व डी वॉर्डातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. दरम्यान चंबूखडी येथे शिंगणापूर योजनेतील जलवाहिनीला लागलेली गळती दूर करण्यास सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस ए, बी व ई वॉर्डातील प्रभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बंद काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने केले आहे.