म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलालगतच्या चौकात पूर्वीप्रमाणे आयलँड बसवावा. या भागात लवकरात लवकर विद्युत दिव्यांची सोय करावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा जीवदान सेवाभावी संस्थेने दिला आहे. या भागातील वाहतुकीला शिस्त लावावी असेही पत्रकांत म्हटले आहे.
पत्रकांत म्हटले आहे, 'पर्यायी पुलावरुन वाहतूक सुरू झाल्यानंतर चौकात आयलँड बसविण्याचे प्रशासनाने मान्य केले. आता वाहतूक सुरू होऊन अनेक महिने झाले. मात्र आयलँड बसविले नाही. चौकात आयलँड नसल्यामुळे वाहनधारकांची मोठी कुचंबणा होत आहे. या ठिकाणी वाहनाचे अपघात घडत आहेत. महापालिका प्रशासनाने या ठिकाणी पूर्वीप्रमाणे आयलँडची व्यवस्था करावी. स्पीडब्रेकर बसवावेत. वाहनधारकांनी वारंवार याकडे लक्ष वेधले आहे. प्रशासनाने वाहनधारक व नागरिकांच्या सहनशीलतेची अधिक वाट न पाहता समस्यांची सोडवणूक करावी.'
संघटनेचे अध्यक्ष अरुण खोडवे, उपाध्यक्ष भगवान खेवरे, वसंत लिंगनूरकर, सुनील निकम, सौरभ पाटील, संदीप खोडवे, अक्षय बागडी आदींनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.