कोल्हापूर टाइम्स टीम
ताराराणी विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थिनींच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन १६ फेब्रुवारी २०२० रोजी केले असून संस्थेच्या स्थापनेपासून १९४५ पासूनच्या सर्व बॅचच्या एक हजारांहून अधिक विद्यार्थिनी मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. कोणत्याही संस्थेच्या माजी विद्यार्थिनीने मेळाव्यात सहभागासाठी https://forms.gle/1LNw7xvSsmcHi1tPA या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, कमला कॉलेजच्या स्वायत्ततेसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, 'ताराराणी विद्यापीठाची स्थापना १९४५ साली झाली. यंदा संस्था अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा घेऊन विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात येणार आहे. वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. संस्थेच्या कमला कॉलेज, उषाराजे हायस्कूल, डीएड कॉलेज, कडगाव येथील कुमार भवन, प्रिन्स शिवाजी विद्यालय येथील विद्यार्थिनींना एकत्र येण्याची पर्वणी मेळाव्यामुळे मिळणार आहे.'
'येत्या वर्षात संस्थेतर्फे काही संकल्प करण्यात आले आहेत. यामध्ये साडेतीन कोटी रुपये खर्च करून विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. हे वसतिगृह सौरऊर्जेवर अद्ययावत करण्यात येणार आहे. कमला कॉलेज स्वायत्त करण्यात येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये वाढ करण्यात येणार असून इंग्रजी माध्यमाच्या शाळेची उभारणी करण्यात येणार आहे.'
पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष एस. एम. पवार, अशोकराव पर्वते-पाटील, मुख्याध्यापिका यू. एस. साठे, प्रभारी प्राचार्य तेजस्विनी मुडेकर, मुख्याध्यापिका विद्या यादव, डॉ. सुजय पाटील, प्रा. अनिल घस्ते, प्रा. एस. ए. साळोखे आदी उपस्थित होते.