बेळगाव : कळसा-भांडुरा प्रकल्पाचे सात टीएमसी पाणी मलप्रभा नदीत वळविण्याची कर्नाटक सरकारची याचिका महादेई जल लवादाने फेटाळल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांनी आवाहन केलेल्या बंदला बेळगाव जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. धारवाड, हुबळी, नरगुंद भागात बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गुरुवारच्या कर्नाटक बंदला धारवाड, हुबळी आणि नरगुंद भागात हिंसक वळण लागले. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कार्यालयांना लक्ष्य करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. धारवाड येथील आकाशवाणी केंद्राच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली तर नवलगुंद येथे आंदोलक शेतकऱ्यांनी बीएसएनएलचे कार्यालय जाळले. बेळगाव जिल्ह्यात आंदोलक शेतकऱ्यांनी तसेच कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करून शहर आणि बाहेरील बससेवा गोंधळ घालून बंद पाडली. बस स्थानकात कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बसचालक आणि वाहक यांच्यावर दमदाटी करून बस डेपोमध्ये घ्यायला लावून त्यांना शिवीगाळही केली.
कित्तूर चन्नमा चौकातदेखील आंदोलकांनी रस्त्यावर झोपून वाहतूक काही काळ अडवली. यावेळी कन्नड संघटनेच्या उद्दाम कार्यकर्त्यांनी पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला पण पोलिसानी त्यांच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष न देता उद्दाम कार्यकर्त्याला ताब्यात घेतले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील काही भागात फिरून दुकाने बंद करण्यासाठी दमदाटी केली पण शहरातील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होते. जिल्हाधिकारी कार्यालय, चन्नम्मा चौक, शहर बस स्थानक आदी ठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून, बैलगाडी आडवी लावून, काटे पसरून वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न केला. खानापूर, कित्तूर, बैलहोंगल, सौंदत्ती आणि रामदुर्ग तालुक्यातील शाळा, कॉलेजांना जिल्हा प्रशासनाने सुटी जाहीर केली होती.