कोल्हापूर टाइम्स टीम
सार्वजनिक गणेशोत्सवात यंदा एकाही मंडळाने डॉल्बीचा दणदणाट करू नये यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मंडळांना केले जात असून, ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांना जबर शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे, असा इशारा विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला आहे. गतवर्षीच्या डॉल्बीवाल्या १६ मंडळांना कोर्टात खेचल्यानंतर यंदा शंभर टक्के डॉल्बीमुक्तीसाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांच्या डॉल्बीमुक्त उत्सव आवाहनाला मंडळेही सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. अलिकडे मात्र गणेशोत्सवातील विधायक उपक्रमांची जागा डॉल्बी साऊंड सिस्टिम आणि तरुणांच्या नाचगाण्यांनी घेतली आहे. १०० ते १५० डेसिबलपर्यंत आवाज वाढवून कानठिळ्या बसवणाऱ्या डॉल्बीच्या भिंती उभ्या केल्या जातात. डॉल्बीच्या स्पर्धेतून मंडळांमध्ये वाद उद्भवतात. यातून मारामारी होऊन उत्सवाच्या पावित्र्यावर विरजण पडते. २०१५ मध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी केलेल्या डॉल्बीमुक्त उत्सवाला मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर २०१५ मध्ये काही मंडळांनी ऐनवेळी डॉल्बीचा दणदणाट केला. गेल्यावर्षी तर पोलिसांनी प्रबोधन करूनही १६ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत आवाज मर्यादेचे उल्लंघन केलेच.
विघातक प्रकार रोखून गणेशोत्सवानिमित्त तरुणाईची ऊर्जा विधायक उपक्रमांकडे वळवण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे. यंदा पुन्हा एकदा पोलिसांनी मंडळांना डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी डॉल्बीमालकांची बैठक घेऊन ६० डेसिबल आवाजाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिक्षेत्रातील सर्वच ठाण्यांच्या अंतर्गत असलेल्या गणेश मंडळांच्या पदाधिकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना डॉल्बीऐवजी विधायक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले जात आहे. शिवाय आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्यास डॉल्बी सिस्टिम आणि वाहने जप्त केली जाणार आहेत. शिवाय मंडळातील सर्व पदाधिकारी, सदस्य, डॉल्बीमालक, वाहनचालक, जनरेटर मालक यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती नांगरे-पाटील यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे मंडळांनीही पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यासह विधायक उपक्रमांची जोड देण्याचेही मान्य केले आहे. मंडळांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त साजरा होण्याची आशा वाढली आहे.
दंडावर निभावले
२०१५ च्या गणेशोत्सवात आगमन व विसर्जन मिरवणुकीत ८० मंडळांनी डॉल्बी लावून आवाज मर्यादेचा भंग केला होता. पोलिसांनी ८० मंडळांवर मुंबई पोलिस ॲक्टनुसार कारवाई करून त्यांना कोर्टात खेचले होते. या प्रत्येक मंडळांवर कोर्टाने २१ ते २५ हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली होती. दंडावर त्या मंडळांचे निभावले होते.
१६ मंडळांचे कोर्टात हेलपाटे
गेल्यावर्षी उत्सवापूर्वी दोन महिने पोलिसांनी मंडळांचे प्रबोधन केले. कडक कारवाई होऊ शकते, कायद्याचा भंग करून नका, असे सांगितले जात होते. तरीही शहरातील १६ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या भिंती उभ्या केल्या. पोलिसांनी या मंडळांचे पदाधिकारी, सदस्य, डॉल्बीचालक, मालक, ट्रॅक्टर-ट्रॉलीमालक, ट्रकचालक व मालक अशा ८० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. कोर्टात हा गुन्हा सिध्द झाला तर प्रत्येक दोषीला दंड व तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
सार्वजनिक गणेशोत्सवात यंदा एकाही मंडळाने डॉल्बीचा दणदणाट करू नये यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मंडळांना केले जात असून, ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांना जबर शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे, असा इशारा विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला आहे. गतवर्षीच्या डॉल्बीवाल्या १६ मंडळांना कोर्टात खेचल्यानंतर यंदा शंभर टक्के डॉल्बीमुक्तीसाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांच्या डॉल्बीमुक्त उत्सव आवाहनाला मंडळेही सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. अलिकडे मात्र गणेशोत्सवातील विधायक उपक्रमांची जागा डॉल्बी साऊंड सिस्टिम आणि तरुणांच्या नाचगाण्यांनी घेतली आहे. १०० ते १५० डेसिबलपर्यंत आवाज वाढवून कानठिळ्या बसवणाऱ्या डॉल्बीच्या भिंती उभ्या केल्या जातात. डॉल्बीच्या स्पर्धेतून मंडळांमध्ये वाद उद्भवतात. यातून मारामारी होऊन उत्सवाच्या पावित्र्यावर विरजण पडते. २०१५ मध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी केलेल्या डॉल्बीमुक्त उत्सवाला मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर २०१५ मध्ये काही मंडळांनी ऐनवेळी डॉल्बीचा दणदणाट केला. गेल्यावर्षी तर पोलिसांनी प्रबोधन करूनही १६ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत आवाज मर्यादेचे उल्लंघन केलेच.
विघातक प्रकार रोखून गणेशोत्सवानिमित्त तरुणाईची ऊर्जा विधायक उपक्रमांकडे वळवण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे. यंदा पुन्हा एकदा पोलिसांनी मंडळांना डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी डॉल्बीमालकांची बैठक घेऊन ६० डेसिबल आवाजाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिक्षेत्रातील सर्वच ठाण्यांच्या अंतर्गत असलेल्या गणेश मंडळांच्या पदाधिकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना डॉल्बीऐवजी विधायक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले जात आहे. शिवाय आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्यास डॉल्बी सिस्टिम आणि वाहने जप्त केली जाणार आहेत. शिवाय मंडळातील सर्व पदाधिकारी, सदस्य, डॉल्बीमालक, वाहनचालक, जनरेटर मालक यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती नांगरे-पाटील यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे मंडळांनीही पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यासह विधायक उपक्रमांची जोड देण्याचेही मान्य केले आहे. मंडळांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त साजरा होण्याची आशा वाढली आहे.
दंडावर निभावले
२०१५ च्या गणेशोत्सवात आगमन व विसर्जन मिरवणुकीत ८० मंडळांनी डॉल्बी लावून आवाज मर्यादेचा भंग केला होता. पोलिसांनी ८० मंडळांवर मुंबई पोलिस ॲक्टनुसार कारवाई करून त्यांना कोर्टात खेचले होते. या प्रत्येक मंडळांवर कोर्टाने २१ ते २५ हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली होती. दंडावर त्या मंडळांचे निभावले होते.
१६ मंडळांचे कोर्टात हेलपाटे
गेल्यावर्षी उत्सवापूर्वी दोन महिने पोलिसांनी मंडळांचे प्रबोधन केले. कडक कारवाई होऊ शकते, कायद्याचा भंग करून नका, असे सांगितले जात होते. तरीही शहरातील १६ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या भिंती उभ्या केल्या. पोलिसांनी या मंडळांचे पदाधिकारी, सदस्य, डॉल्बीचालक, मालक, ट्रॅक्टर-ट्रॉलीमालक, ट्रकचालक व मालक अशा ८० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. कोर्टात हा गुन्हा सिध्द झाला तर प्रत्येक दोषीला दंड व तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.