म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
‘मानाचे पान,’ ‘जय मल्हार,’ ‘दो आँखे बारह हाथ’ या गाजलेल्या सिनेमातील निवडक प्रसंग, त्या सिनेमात दिवंगत अभिनेते बाबूराव पेंढारकर यांच्यावर चित्रीत प्रसंग, त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी दिलेली दाद आणि मान्यवरांनी सांगितलेल्या आठवणीतून स्मृती जागविण्यात आल्या. डॉ. चंद्रकांत मांडरे कला अकादमीच्यावतीने अभिनेते बाबूराव पेंढारकर यांचा ५० वा स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम झाला.
शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिनेसृष्टीतील जुन्या काळाचा माहोल अनुभवायला मिळाला. ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, मांडरे कला अकादमीचे विश्वस्त, शास्त्रज्ञ डॉ. आर. व्ही. भोसले यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शिंदे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी पेंढारकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांची अभिनयशैली, विविध प्रकारच्या साकारलेल्या व्यक्तिरेखा, मराठी व हिंदी सिनेमातील भूमिका याविषयींच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. यानंतर ‘मानाचे पान, जय मल्हार, दो आँखे बारह हाथ’ या सिनेमातील निवडक प्रसंग दाखविण्यात आले.
कला अकादमीचे विश्वस्त विश्वास काटकर यांनी प्रास्ताविक केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. कला अकादमीचे विश्वस्त मोहन पतंगे यांच्यासह कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.