अ‍ॅपशहर

तोट्यामुळे केएमटीच्या चाकांना खिळ

Maharashtra Times 16 Feb 2017, 3:00 am
Appasaheb.mali@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur carporation kmt shivsena
तोट्यामुळे केएमटीच्या चाकांना खिळ

Tweet : @Appasaheb_MT

कोल्हापूर : महापालिकेतील शह, काटशहाच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला आपल्या सोबत विरोधी भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीला चांगलाच झटका दिला. शिवसेनेच्या सत्तेतील सहभागामुळे महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी भक्कम झाली. शिवसेनेला पद मिळाले. त्याचबरोबर चमत्कार घडविण्यासाठी नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याच्या राजकारणाला चाप बसला. पण सध्या​ आर्थिक तोटा, वडाप व्यावसायिकांच्या आव्हानामुळे केएमटीला ठिकठिकाणी ब्रेक लागत आहे. कर्मचाऱ्यांची देणी, खर्च आणि उत्पन्नाचाचा ताळमेळ बसेनासा झाला आहे. महापालिकेत एकीकडे सत्ता भक्कम झाली,पण परिवहनच्या भवितव्याबाबत काय असा प्रश्न कायम आहे.

महापालिकेचे सध्याचे सभागृह अस्तित्वात येऊन सव्वा वर्ष उलटले. या कालावधीत ​महापालिकेत विकास कामापेक्षा राजकारण अधिक रंगले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी भाजप, ताराराणी आघाडीने सातत्याने एकमेकावर कुरघोडीचे राजकारण केले. महापालिकेत भाजपाचा महापौर करण्याची भाषा भाजप नेते अधूनमधून करतात. स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत सत्तारुढ काँग्रेस आघाडीला आव्हान दिले. सव्वा वर्षाच्या कालावधीत महापालिकेत मोठा प्रोजेक्ट आला नाही, नगरसेवकांना बजेट मिळवताना नाकी नऊ येत आहेत. त्यामुळे मोठ्या अपेक्षा ठेवून महापालिकेत दाखल झालेले नगरसेवक अस्वस्थ आहेत.

३१ जानेवारी रोजी झालेल्या स्थायी समिती सभापतीच्या निवडीला काँग्रेसच्या एक नगरसेविका गैरहजर राहिल्या. नगरसेविकेच्या गैरहजेरीवरुन सत्तारुढ आणि विरोधकात आरोप, प्रत्यारोप झाले. त्याहीपेक्षा काँग्रेसचा एक सदस्य, गैरहजर राहतो हे सत्तारुढ गटासाठी धोक्याची घंटा होती. विरोधी गटाकडून सत्तारुढ गटाच्या नगरसेवकांना फूस लावण्याच्या प्रकारात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्तारुढ गटाने वेळीच हा धोका ओळखून सेनेलाच सत्तेत सामावून घेतले. सेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे महापालिकेत काँग्रेस आघाडी भक्कम झाली. दोन्ही काँग्रेस, शिवसेना एकत्र येण्यात स्थानिक राजकारण आणि भाजप-महाडिक विरोध हा समान धागा आहे.

आता सत्तारुढांच्या कळपात

महापालिका निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेचे चार नगरसेवक म्हणजे वाघ आहेत, ते विरोधकाची भूमिका प्रभावीपणे पाडतील अशी घोषणा केली होती. पण सव्वा वर्षाच्या कालावधीतच शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान, राहुल चव्हाण, अभिजित चव्हाण, प्रतिज्ञा निल्ले हे काँग्रेसच्या कळपात दाखल झाले आहेत. दुसरीकडे शहरातील नागरी प्रश्नावरुन शिवसेनेने सातत्याने आंदोलने केली. महापालिकेतील सत्तारुढ काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात आवाज उठविला. सत्तारुढमधील पदाधिकाऱ्यांवर आरोप केले. रस्ते, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, पाणी पुरवठा यावरुन शिवसेना आक्रमक होती. आतापर्यंत ज्यांच्या कारभाराच्या विरोधात आंदोलने झाली आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून शिवसेना बसणार आहे. नागरी प्रश्नावर आंदोलन करताना शिवसेनेची कसोटी लागणार आहे.

‘केएमटी’च्या सक्षमिकरणाचे

शिवसेनेसमोर आव्हान

महापालिकेत शिवसेनेला पद मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. शिवसेनेचे गटनेते नियाज खान यांची परिवहनपदी निवड झाली आहे. नियाज खान हे महापालिकेत पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करत आहेत. तरुण आहेत. शिवसेनेत ते पहिल्यापासून सक्रिय आहेत. सध्या राज्यातील सत्तेत शिवसेना ही सहभागी आहे. परिवहन खाते ​सेनेकडे आहे. त्याचा फायदा केएमटीला होईल, सरकार दरबारी पाठपुरावा करुन केएमटीसाठी जादा निधी मिळवता येईल हा नियाज खान यांचा आशावाद रास्त आहे. नियाज खान यांनी परिवहन समिती सभापतिपद म्हणून काम करत असताना केएमटीसाठी जादा निधी, प्रवासांना सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली तर बहुतांश तक्रारी कमी होतील. केएमटी कर्मचाऱ्यांनाही नजीकच्या काळात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सहावा वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू होणार आहे. त्याचा आर्थिक ताण ही वाढणार आहे. यामुळे केएमटीला उत्पन्न वाढ, पर्यायाने प्रवासी उठावावर भर द्यावा लागणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज