अ‍ॅपशहर

बालगुन्हेगार दुपटीने वाढले

कोल्हापूर : अल्पवयीन (विधीसंघर्षग्रस्त) तरुणांचा गुन्हेगारी कृत्यांमधील सहभाग वाढला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बालगुन्हेगारांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.

Maharashtra Times 14 Sep 2017, 3:00 am
Uddhav.Godase@Timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur juvenile delinquency rate increased
बालगुन्हेगार दुपटीने वाढले


Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : अल्पवयीन (विधीसंघर्षग्रस्त) तरुणांचा गुन्हेगारी कृत्यांमधील सहभाग वाढला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बालगुन्हेगारांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. २०१६ मध्ये १०० गुन्हेगारांची नोंद आहे, तर यंदा जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत १६३ गुन्हेगारांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गंभीर गुन्ह्यातही अल्पवयीनांचा समावेश आहे. खून, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, बलात्कार, घरफोड्या, दंगल आणि मारामारीच्या घटनांमधील वाढलेला अल्पवयीनांचा सहभाग चिंताजनक आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांच्या मानसिकतेमध्येही झपाट्याने बदल घडत आहेत. मध्यमवर्गीयांसह उच्चवर्गीयांनाही मुलांसाठी पुरेसा वेळ नाही. पालकांच्या चंगळवादाचा मुलांवर मोठा प्रभाव आहे. कमीतकमी वेळेत जास्तीतजास्त आनंद उपभोगण्याची वृत्ती वाढली आहे. त्यामुळे भौतिक साधनांचा हव्यास वाढत आहे. मुलांमधील हिंसा आणि गैरप्रकार वाढण्यासाठी काही प्रमाणात चुकीचे पालकत्वही जबाबदार ठरत आहे. वस्तुस्थितीजन्य पालकत्वापेक्षा आदर्शवादी पालकत्वाच्या भ्रामक संकल्पनांमुळे मुले आणि पालकांमध्ये दरी वाढल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. शाळेत दांडी मारण्यापासून ते होमवर्क टाळणे, मुद्दाम खोटे बोलणे, घरातून पैसे चोरणे या छोट्या घटनांपासूनच मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळते. सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या अतिरेकी वापराने मुलांमधील निरागसता हरवत आहे. मुलांमधील हा अनैसर्गिक बदल धोकादायक ठरत आहे.

२०१६ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात विविध गन्ह्यात १०० बालकांचा सहभाग होता. यंदा मात्र हे प्रमाण दुपटीहून अधिक आहे. जानेवारी २०१७ पासून ऑगस्टपर्यंत १६३ बालगुन्हेगारांची नोंद पोलिसांच्या महिला व बालसमुपदेशन विभागाकडे झाली आहे. यातील तिघांवर खुनाचा गुन्हा आहे, १२ जणांनी खुनाचा प्रयत्न केला आहे. ४० अल्पवयीनांवर मारामारीत गंभीर दुखापत केल्याचे गुन्हे दाखल आहेत. चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीच्या घटनांमध्ये ४७ अल्पवयीनांचा सहभाग आहे. गंभीर बाब म्हणजे ३ अल्पवयीन तरुणांवर बलात्काराचे गुन्हे आहेत, तर १४ अल्पवयीनांवर विनयभंगाचे गुन्हे आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुपटीने वाढत असलेली बालगुन्हेगारांची संख्या सामाजिक स्वास्थ्यासाठी नक्कीच धोकादायक आहे.


गंभीर शिक्षेचा अभाव

वयाची १२ ते १८ या वर्षांमध्ये मुलांकडून गंभीर गुन्हे घडत आहेत. निरीक्षणगृह किंवा बालसुधारगृहात आठवडाभर थांबल्यानंतर जामीन मंजूर होतो. फार तर महिनाभर शिक्षा होते. गुन्ह्यांचे स्वरुप गंभीर असले तरी शिक्षेचे स्वरुप क्षुल्लक आहे. विशेष म्हणजे गुन्हे करणाऱ्या बहुतांश अल्पवयीनांना शुल्लक शिक्षेची जाणीव असल्यानेच ते वारंवार गंभीर गुन्हे करतात. शिक्षेचा धाक नसल्यानेच बालगुन्हेगारांच्या संखेत वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


गंभीर गुन्ह्यातील बालगुन्हेगार

खून ३

खुनाचा प्रयत्न १२

बलात्कार ३

चोरी, दरोडे ४७

गंभीर मारामारी ४०

विनयभंग १४

दंगल १६

==========

बालगुन्हेगारी वाढणे हे चांगल्या समाजाचे लक्षण नाही. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विधीसंघर्षग्रस्त बालकांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. गुन्हे घडू नयेत यासाठी कुटुंबासह शाळांमधून मुलांवर संस्कार होणे गरजेचे आहे.

संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज